आपला जिल्हा

विकासाचा ध्यास घेतलेलं सांगवीभुसार गांव


विकासाचा ध्यास घेतलेलं सांगवीभुसार गांव
भाग २
(लेख क्रमांक १४/लेखक पंडित निंबाळकर )

कोपरगाव : संत गाडगे बाबा अभियाना द्वारे अनेक गांव विकासाकडे वाटचाल करू लागली. त्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या आणि आमच्या गावातील तरूणांनी या संधीचा फायदा करून घेण्यासाठी दिशादर्शक काम सुरू केलं. योगायोगाने उत्कृष्ट तरूण, होतकरू ग्रामपंचायत सदस्य टीम त्यावेळी होती तिचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. सरपंच मंगल अंबादास माळी, उपसरपंच माणिकराव शिंदे, तर अडीच वर्ष उपसरपंच गणपतराव वाबळे, देवगीर गोसावी, सोपान माळी, कलाबाई बाबूराव मेहरखांब, कलावती नानासाहेब कासार , आण्णासाहेब बगाटे, आण्णासाहेब जाधव यांची एकमेकांचे विरोधक असूनही गावाच्या विकासासाठी एक झालेले हे सर्व सदस्य म्हणूनच कायम लक्षात राहिले आहेत. तीघे सदस्य पतींचे अभियान कामांत त्यांचा मोलाचा वाटा होता. बाबूराव मेहरखांब थट्टेने इतर सदस्यांना म्हणायचे की तुम्ही फक्त सदस्य आहात आम्ही सदस्यांचे नवरे आहोत. यांवर सगळेच हसायचे. असो.
पुढे बिनविरोध म्हणून संपूर्ण महिला सदस्यांची टीम निवडली तीचं सरपंचपद सौ अलकाताई राजेंद्र जाधव यांनी यशस्वीपणे सांभाळले. उपसरपंच लिलाबाई बाजीराव आरोटे आणि संपूर्ण कमिटीने त्यांना चांगली साथ दिली. त्यांच्या कार्यकाळात अनेक योजना राबवल्या गेल्या. सौरपथ दिवे बसवणे, सिमेंट चे गल्लीतले रस्ते, नळ पाणी योजनेचे आदर्श वत कामं गावासाठी सर्वांत मोठे आणि महत्वाचे झाले. छोट्या गावासाठी योजना मिळतं नव्हती पण राजेंद्र बापूंनी राजकीय ओळख, वजन आणि कौशल्य वापरून यश मिळवले. दोन तीन तरूणांना कायमचा रोजगार मिळाला. बापूंचा टीम सोबतचा संवाद आणि वावर प्रभावित करायचा. एखादा स्वतंत्र लेख लिहून त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न पुढे नक्कीच करणार आहे. असो
बातम्या तर खूप पाहिल्या पण विकासाची ठोस दिशा सापडतं नव्हती मग या आदर्श गावांचा अभ्यास दौरा या सदस्यांनी केला, हा दौरा पुढे स्व खर्चातून वाढवत गोव्यापर्यंत नेला आणि वादात सापडला. बहुतेक अभ्यास दौऱ्यांच असंच होतं. तरीही पाहिजे तसा उत्साह येतं नव्हता. मग गावातील तरूणांची, कारभार करणाऱ्या गावातील मातब्बर मंडळींची सहल नेण्याचा धाडसी निर्णय बापू आणि नानाभाऊ यांनी घेतला. धाडसी म्हणण्याच कारण म्हणजे जर पुढं विकास झाला नसता तर कायम स्वरूपी या सहलीकडे बोटं दाखवून बोल लावता आला असता म्हणून धाडसी निर्णय होता. दोन प्रायव्हेट बस मध्ये बसलो आणि हिवरे बाजार, बोरबन, कामरगाव, राळेगण सिध्दी, वडगाव लांडगा अशी काही आदर्श गांव पाहीली, तेथील विकास समजून घेतला. आणि एक दिशा मिळाली.
पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून दलित वस्तीच्या योजना मंजूर करून योग्य पाया रचला गेला. बंदिस्त गटार करण्या साठी मुरलीधर शिंदे, नानासाहेब शिंदे यांनी घरासमोरील जागा देत सहकार्य केले. हळूहळू लोक सहभागाच बळ एकवटत गेलं. सुरूवातीला त्रास झाला. पण एक एक करतं प्रतेक माणूस या अभियानात जोडला गेला. त्यामुळे कुणा एकाचा उल्लेख करणं योग्य होणार नाही. पण काही नांव आवर्जून घ्यावीच लागतील. त्यातला संजय पावडे हा तरूण सर्वात अगोदर यांत स्वयं प्रेरणेने सहभागी झाला. स्वतःचं छोटस हाॅटेल सांभाळून स्वच्छतेच्या कामांत वाहून घेत राहीला. पुढे आदिवासी मित्रांची एक टीम तयार करून बरचस काम यांनी केलं. या टिम मध्ये भाऊसाहेब माळी, रविंद्र पवार, विजू माळी, दिपक माळी असायचे. अनेकदा स्व खर्चातून संजूने मुलांना चहा, जेवण व स्वच्छता साहित्य खरेदी करून दिलं याचा मी स्वतः साक्षीदार आहे.
पंचायत समितीचे बिडीओ वाघ साहेब यांनी हा उत्साह पाहून विस्तार अधिकारी पडवळ साहेब आणि ठाकूर साहेब या तरूण जोडीला गावाच्या मदतीला धाडले. ते दोघे रोजच गावात येऊन विकासाची संकल्पना मांडू लागले. या स्पर्धेतील एका एका गुणाचा अभ्यास करून तो मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार मांडू लागले आणि नानाभाऊ झपाटल्यासारखे त्यांचा विश्वास सार्थ करण्यासाठी लढू लागले. त्यांच्या बरोबर किशोर जाधव,शांताराम कासार, राजेंद्र शिंदे, हरीभाऊ शिंदे, पप्पू जाधव, आण्णा शिंदे, गोरख बंद्रे, निवृत्ती चुनाळे, सुभाष बंद्रे, पंढरीनाथ जाधव, बाबासाहेब जाधव आणि बजरंग मंडळाची टिम असायची. या काळात नानाभाऊंचे स्वतःच्या शेतीकडे फार दुर्लक्ष झालं. तसेच दुर्लक्ष गावातील अनेकांचे सुध्दा झाले. नानाभाऊ, पडवळ साहेब आणि ठाकूर साहेब हे अनेकदा गावकऱ्यां सोबत टॅक्टरच्या, झाडाच्या सावलीत जेवले हे पाहून लोकांची झापडं उघडली आणि जे आपल्या गावचा पोपट पवार अस मागं म्हणतं होती ती माणसं सुध्दा स्वच्छता अभियानात जोडली गेली. हेवेदावे विसरून, राजकारण बाजूला ठेवून माणसं एक झाली ती कायमची. नंतर आलेले बिडीओ चव्हाण साहेब यांनी सुध्दा गावाला विशेष सहकार्य केले. तसेच नगर येथील यांत्रिक विभाग इंजिनिअर ढोकळे साहेब यांचं मोलाचं सहकार्य गावाला लाभले होते. त्यावेळचे आमदार कोल्हे साहेबांचे विशेष सहकार्य लाभले होते.
एक गांव एक रंग यासाठी आख्या गावातील घरांना रंग देण्यात आला. त्यासाठी जनार्धन मोरे (काका) यांचे पाहूणे चव्हाण साहेब यांनी रंग आणि साहित्य देऊन हातभार लावला होता, रंगकामासाठी नवनाथ बंद्रे यांची औषध फवारणीची बुलेट गाडी वापरली होती. साथीचे रोग जावे म्हणून फवारणीची जबाबदारी त्यांच्याकडे आणि सोमनाथ कासार यांच्याकडे होती. भिंतीवर श्लोगन, सुविचार लिहीण्यासाठी साळुंके सर, विशाल पठाडे, सोमनाथ वाहूळ या कलाकारांनी आपली कला दाखवली. गांव दिमाखात नटले होते. योगेश शिंदे, दिगंबर चव्हाण, भाऊसाहेब वाबळे, नवनाथ शेळके, बाबासाहेब लांडगे, मोहन गोसावी, निवृत्ती सोनवणे, शशिकांत माळी, इत्यादींचा उत्साही सहभाग असायचा, नियोजनासाठी धावपळ सुरू असायची.
महिला बचत गटाच काम अंजली पुंजाराम माळी, अक्काबाई कदम, शिंदे ताई यांनी यशस्वीपणे सांभाळले. अंजली स्वतः ग्रॅज्युवेट असल्याने महिलांना समजावने तिला सहज शक्य झाले. निरंकारी मंडळाचे केंद्र चालवण्या मुळे तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. भव्य स्वागताची रांगोळी राजश्री गोसावी यांनी काढली. तसेच बांधकाम कारागिरांचा उल्लेख करावाच लागेल. कारण शोष खड्याचे शौचालय बांधण्याच मोठं कामं त्यांनी यशस्वी केले. त्यात बाबूराव मेहरखांब,ज्ञानेश्वर क्षीरसागर, मच्छिद्र जोर्वेकर, भाऊसाहेब कांबळे, राजू पावडे, गिरीधर मेहरखांब, प्रकाश मेहरखांब, भास्कर बाबा जाधव, पारागीर गोसावी, संजय रहाणे, ज्ञानेश्वर भालके, संजय गोदावरे, यांचा उल्लेख करावा लागेल. जयवंती बाई सोनवणे यांना शौचालय बांधकामासाठी जागा नसल्याने घरातच शोष खड्डा घेऊन बांधकाम करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे प्रत्येक टीम तो प्रयोग आवर्जून दाखवला जाई. अनेक माणसांनी ट्रॅक्टरचे योगदान दिले. सोपान सोनवणे, जालिंदर जगदाळे, ज्ञानदेव वाकचौरे यांनी विटा पुरवल्या, अनेकांनी गटार साफ केली, काट्या तोडल्या. खुरपे घेऊन गवत काढले,घरांना शाळेला रंग दिला, शाळेची शिक्षकांची टीम फलक बनवणे, पताका लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे, स्वच्छता दिंडी काढून प्रबोधन करणे यासाठी सज्ज असायची,या टीम मध्ये पठाडे सर, डीके जाधव सर, साळुंके सर, बेलदार सर, अंभोरे सर, डहाळे सर, शुरवाडे सर, बर्वे सर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
गावात झाड लावली, दगड रंगवून रस्ता शोभिवंत केला, सांगवी फाटा ते गांव रांगोळी टाकणे आणि कचरा सफाई विष्णू कासार, सुदाम कासार विलास कासार, आण्णा बगाटे, सिताराम जाधव यांच्या टिम कडे होती. तळवाट रस्त्याची जबाबदारी जीवन जाधव, भाऊसाहेब जाधव, देवराम वाबळे, मोहन कासार, रावसाहेब जाधव यांच्या टिम कडे होती. मुखेड वाटेची जबाबदारी अशोक आण्णा जाधव, नानासाहेब शिंदे, रोहिदास शिंदे, बाळासाहेब शिंदे, अभय देशमुख यांच्या कडे होती. चावडी परिसराची जबाबदारी मधुकर वाहूळ, जगन वाहूळ, दिलीप गायकवाड, विजय गायकवाड यांच्या कडे होती. लक्ष्मी आई मंदिर परिसराची जबाबदारी आनंदा माळी, परसराम माळी, युवराज माळी, भास्कर माळी यांच्या कडे होती.
शाळेच्या लोखंडी कंपाऊड रंगवण्याचे काम केले होते. महिलांनी रस्ते स्वच्छ केले,कचरा उचलला, अनेकांची रस्त्यावर असलेले उखाडे उचलले. सांड पाण्यासाठी शोष खड्डे घेतले या साठी स्वाध्याय परिवाराची टीम माधव आप्पा जाधव यांचे सोबत असायची विजय कासार, आमदार कासार, किशोर बगाटे,प्रविण जाधव आणि इतर असायचे. सफाई कर्मचारी राणू बाबांनी किळस न करता घाण उचलली, हौद, सार्वजनिक शौचालय साफ केली. तुकाराम मिसाळ यांच्याकडे दवंडी देण्याचं काम असायचे नंतर लाऊडस्पीकर खरेदी केल्यावर ती जबाबदारी माझ्या कडे होती. पहाटे उठून भजनांची कॅसेट वाजवली जायची, अनेक टीमच्या स्वागताच्या सुचना दिल्या जायच्या. दाखले उतारे देता देता गावाच राजकारण, समाजकारण जवळून शिकता आलं. किशोर टेलर, बाळासाहेब टेलर, साहेबराव टेलर, शिवाजी टेलर, बाबासाहेब घोडे टेलर, कऱ्हे टेलर यांनी वेळोवेळी कापडी ध्वज, बॅनर यासाठी सहयोग केला.
रेन वाॅटर हारवेस्टिंग अशी प्रत्येक घटना लिहीली तर एखादं पुस्तक तयार होईल इतकं काही आहे. पंढरीनाथ मोरे तात्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल कारण त्यांच्या अनेक योजना अधिक मार्क मिळवून द्यायच्या. कितीही मोठा अधिकारी आला की त्यांच्या अफलातून योजना पाहून प्रभावित होऊन जायचा. पावसाच पाणी साठवून वर्षं भर पिण्यासाठी वापरणे असो. बिन पायाचा बंगला, सुसज्ज गोठा, खत निर्मिती प्रकल्प, गांडूळ खत अजून बरेच होते आता आठवत नाहीत. हे प्रयोग दाखवण्याची जबाबदारी प्रशांत मोरे, उध्दव मोरे यांच्याकडे होती. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ शिंदे यांच्या सहयोगाने पशू चिकित्सा कॅम्प घेऊन पाळीव प्राण्याची काळजी घेतली. प्रवरा मेडिकल हॉस्पिटल च्या माध्यमातून रक्त दान शिबिर आणि आरोग्य तपासणी कॅम्प घेऊन आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. गावाची माहिती देणारी पुस्तिका बनवली. फोटो अल्बम द्वारे झालेला काया पालट दाखवला जायचा. राजाभाऊ कदम फोटो साठी तत्पर असायचे. विजय शेळके, काकासाहेब खर्डे यांनी सार्वमत, सकाळ, गावकरी, देशदुत, लोकमत वर्तमानपत्रातून गावाची कहाणी प्रकाशित केली. संदीप बगाटे, संजय मेहरखांब, संजय पावडे यांनी घरोघरी वर्तमानपत्र वाटले. त्यामुळे जागृती आली, महत्व पटले.
सकाहरी थोरात यांनी पडवळ साहेब आणि ठाकूर साहेब यांना राम लक्ष्मणाची उपमा दिली. आदरणीय बापूंना नामदेव आणि नानाभाऊना चांगदेव असे ते म्हणायचे. तर कधी निवृत्ती, ज्ञानदेव म्हणायचे. तालुक्यात आणि जिल्ह्यात क्रमांक मिळवताच. जिल्हा अधिकारी प्राजक्ता लवंगारे मॅडम यांनी गावाचा पाहणी दौरा केला. अनेक योजना राबवल्या पुढे अनेकदा गावाला भेट दिली. जिल्हा अधिकारी अनिल लांडगे साहेबांनी सुध्दा मोलाचे सहकार्य दिले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या कडे गांव विकासाच्या अनेक योजना असतात, त्या योग्य पध्दतीने राबवल्या तर विकास हमखास होतो.
आमच्या गावाला या अधिकाऱ्यांच्या दौऱ्याची खूप सवय झाली होती, की जिल्ह्याचा अधिकारी आला तरी लोकांना विशेष वाटायचं नाही, कारण मंत्री आणि राज्यस्तरीय अधिकारी रोजच भेटी देऊन जायचे. लाल दिव्याची गाडी सतत गावाला दिसतं रहायची. सह्याद्री वाहिनी वर विकासाची यशोगाथा या कार्यक्रमात दोन, तीन वेळा सांगवी भुसार गावाचा कायापालट दाखवला गेला. टिव्ही रेडिओ, वर्तमानपत्रात मुलाखती, बातमी छापून येऊ लागल्या. गाव प्रकाश झोतात आले. अनेक पुरस्कार मिळाले निर्मलग्राम हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. गाडगे बाबा अभियानाचा लोक सहभागाचा राज्यस्तरीय विशेष पुरस्कार मिळाला. दलित वस्ती योजना पुरस्कार, विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय, तालूका आणि गटातील अनेक पुरस्कार मिळाले. गावांची ओळख आदर्श गांव म्हणून झाली. खूप काही शोसल ,त्रास सहन केला म्हणून यश मिळाले. नंतर येणार्या पहाणी पथकाला गाव दाखवायचा कंटाळा येऊ लागला होता.
राज्यस्तरीय टिमचे भव्य स्वागत हा चर्चेचा विषय झाला होता. नव्या शाळे पुढे विशाल पठाडेच्या कल्पनेतून उभारलेला स्वागताचा माती विटाचा स्वागत फलक, लावलेले झेंडे, रस्ते, चौक यांच्या नावाच्या पाट्या, दुतर्फा झाडं, मांडलेले दगड, टाळ मृदंगाचा गजर करत केलेले स्वागत याची जबाबदारी माणिकराव बगाटे, बाबासाहेब बगाटे, ज्ञानेश्वर बंद्रे, विलास चव्हाण यांच्या कडे असायची इतर भजनी मंडळ साथीला असायचे. नेत्यांच्या जिवंत प्रतिकृती उभारून वेगळा ठसा उमटवला होता. सकाहरी थोरात बाबा महात्मा गांधी, सुरेश मिसाळ गाडगे बाबा, भीमराज गायकवाड आंबेडकर, हरीभाऊ जाधव शाहू महाराज , पदमाताई गाडेकर सावित्रीबाई असे जिवंत देखावा निर्माण केला होता. काही नावांचे विस्मरण झालं त्याबद्दल दिलगिरी.
बाळासाहेब कासार, सकाहरी थोरात, कैलास गाडेकर, नंदकिशोर लांडगे,राजेंद्र मेहरखांब सर, खंडीझोड सर, नानाभाऊ, आणि बापू यांची माहिती पुर्ण भाषणं हा अलौकिक सोहळा टिमला माहिती करून द्यायचा. सभा मंडप, साऊंड आणि शोभेची जबाबदारी अर्थातच प्रदिप कुलकर्णीं (गुरू) कडे असायची. टीमच्या जेवणाची सोय वस्ती वर असायची. सत्कार आणि स्वच्छता साहित्याला दुकानदार मंडळी सुखदेव बगाटे, राजेंद्र डबे, एकनाथ शेळके हे मदत करायची. बाबासाहेब गोसावी यांनी थकलेल्या माणसांना चहा, पाववडे देऊन भुक भागवली, भानुदास जाधवने वेलडींगची कामं करून देतं सहयोग दिला. स्ट्रिट लाईची जबाबदारी सोपान घोडे, आदिनाथ चव्हाण, पंकज शिंदे यांच्या कडे होती. गोदावरी दुध संघाची वाहने, साहित्य, असे बरेच काही मदतीला असायचे. ज्याला जे शक्य होईल ती मदत करतं होता त्यामुळे प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख खरंच शक्य नाही. तरी पण त्यांनी दिलेलं योगदान लाख मोलाच होतं आणि आहे.


ही विकासाची प्रक्रिया आजही गावात सुरू आहे. एच डी एफ सी बॅंकेच्या माध्यमातून नारळाच्या झाडांचा यशस्वी प्रयोग गावात झाला आहे. आदरणीय आमदार काळे साहेब यांनी तळवाट रस्ता, मुख्य रस्ता आणि जुना मळेगाव ते मायगांव रस्त्या मंजूर करून विकासाचा महत्वाचा टप्पा पार पाडला आहे. तसेच वनविभागाने स्मशानभूमीत केलेले वृक्षारोपण खूप महत्त्वाचे आहे. आताच नवीन ग्रामपंचायत सदस्य कमिटीने गावातील कामासाठी, कचरा उचलण्यासाठी घेतलेला ट्रॅक्टर हे अजून एक महत्त्वाचं कामं नेतृत्वाने केलेलं आहे. नवीन कमिटी मध्ये सरपंच रमेश आहेर उपसरपंच मोहन कासार, दिपक माळी, सुनंदा माळी, रंजना शिंदे, भाऊसाहेब जाधव, लहानुबाई मेहरखांब, पुष्पाताई जाधव, वंदना शिंदे यांनी विकासाची दिशा पुढे चालवण्याचा वसा घेतला आहे. सध्या कार्यरत असलेले ग्रामसेवक महेश काळे भाऊसाहेब यांनी योग्य साथ दिली आहे. होतकरू ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ डफळ यांचे सहकार्य लाभत असल्याचं लोक आवर्जून सांगतात. नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुध्दा नव्या दमाने सज्ज झाले आहे. गावाचा विकास करताना सर्व योजना एकदम राबवता येतं नाही. कधी प्रशासकीय अडचणी मुळे काही कामं रखडली जातात. त्यामुळे अनेकदा याचा दोष नेतृत्वाला सहन करावा लागतो. गावकी आणि भावकी मध्ये विरोध हा असतोच, असलाच पाहिजे कारण त्यामुळे राहून गेलेल्या कामाकडे तसेच आपल्या त्रुटी कडे लक्ष खेचले जाते. ती समस्या कशी सोडवता येईल याचा विचार आपोआप सुरू होतो. थोडफार उशीर झाला तरी पर्याय सापडतो. आपल्याला एखादं कामं सोपं वाटतं असलं तरी त्याला अनेक अडचणी असतात हे ही समजून घेतलं पाहिजे. कधी कधी निर्णय फसतातही शेवटी नेतृत्व करणारा सुध्दा माणूसच आहे. आणि लेख लिहीणारा सुध्दा माणूसच आहे. जर काही चुकलं राहून गेलं असं वाटलं तर मोठ्या मनाने माफ करा. विकासाचा ध्यास घेतलेलं गांव सांगवी भुसार हे एक आदर्श गांव आहे असंच कार्य करण्याचा प्रयत्न करा. थांबतो, धन्यवाद.

लेखक पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

 

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे