आमदार साहेब आपण लवकर बरे व्हावेत हीच आम्हा सर्व बहिणींची साईचरणी प्रार्थना.. सौ वैशाली प्रमोद आभाळे
आमदार साहेब आपण लवकर बरे व्हावेत हीच आम्हा सर्व बहिणींची साईचरणी प्रार्थना..
सौ वैशाली प्रमोद आभाळे
(माजी सरपंच मढी खुर्द)
कोपरगाव प्रतिनिधी : संपूर्ण जग जेव्हा कोरोनाच्या विळख्यात सापडले होते तेव्हा कोपरगाव तालुकाही याला अपवाद नव्हता. या कालावधीत काही मृत्यू झाले ही नक्कीच दुर्दैवी व दुःखद गोष्ट होती परंतु कमीत कमी रुग्णांवर कोपरगाव तालुक्याने कोरोनाला थांबवण्यात यश मिळवले होते. ही आपल्या सर्वांसाठी समाधानाची गोष्ट होती व आहे. या सर्वांमध्ये प्रशासनाचा मोठा वाटा नक्कीच आहे पण मला विशेष कौतुक करावे वाटते ते प्रशासनाचे सेनापती होऊन काम करणाऱ्या आमदार आशुतोषदादांचे !
कोरोनासंदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्यावेळी दादांनी तालुक्यातील सरपंचांना फोन केले होते. जेव्हा दादांचा फोन आला आणि माझी दादांशी फोनवर जी चर्चा झाली त्या चर्चेने मी अक्षरशः भारावून गेले होते. खरच एखादे आमदार कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमदार आशुतोषदादा काळे आहेत असंच मी म्हणेन.
तुमच्या गावातील परिस्थिती कशी आहे? गावात फवारणी केली का? गावातील नागरिकांना रेशन वाटप झाले का? पुणे, मुंबई किंवा इतर जिल्ह्या मधून आलेले किती जण क्वारंटाईन आहेत? किती जनांचा क्वारंटाईनचा कालावधी संपला आहे? गावात सॅनिटायझर वाटले का? लोक सोशल डिस्टन्सिंग पाळत आहेत का? गरीब कुटुंबातील कोणी उपाशी तर नाही ना? ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत असताना आशा, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेताय का? आरोग्य विभागामार्फत प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे झाला का? गावच्या प्रथम नागरिक म्हणून या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना स्वतःच्या व कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेताय का? अशा एक ना अनेक गोष्टींची दादांनी चौकशी केली. दादांच्या बोलण्यातून त्यांची नागरिकांबद्दल असलेली तळमळ शब्दाशब्दाला दिसुन येत होती. कोरोनाला रोखायचे असेल तर विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे दादांनी वारंवार सांगितले. *कोणतीही अडचण असली तरी मला अर्ध्या रात्री मला फोन करून कळवा हे दादांचे शब्द खरच खूप आश्वासक होते. एक मोठा भाऊ जशी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी खांद्यावर घेतो तशीच काहीशी भावना दादांशी बोलताना माझ्या मनात तयार झाली होती.आशुतोषदादा जरी वयाने कमी असले तरी कार्याने ते आपल्या सर्वांपेक्षा फार मोठे झाले आहेत.*
जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले आहे तेव्हापासून दादा कोपरगाव तालुक्याच्या नागरिकांची आरोग्य विषयक गैरसोय होऊ नये म्हणून विविध प्रयत्न करत होते कोपरगावला कर्मवीर शंकरराव काळे साहेबांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले. कोविड सेंटर मध्ये दाखल रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रत्यक्ष भेटून रुग्णांशी संवाद साधणे, त्यांच्या सकस आहाराची व्यवस्था ठेवणे, त्यांना उच्चशिक्षित डॉक्टरांकडून चांगले औषधोपचार उपलब्ध करून देणे अशा अनेक गोष्टी दादांनी केल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राचे नंबर उपलब्ध करून दिले. सरकारी दवाखान्यावरचा भार कमी व्हावा म्हणून कम्युनिटी क्लिनिक सुरू केले. त्यांनी आपल्याला इतर आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांचे फोन नंबर उपलब्ध करून दिले. गॅस एजन्सीचे नंबर उपलब्ध करून दिले. ग्रामीण रुग्णालयात गरजेचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. शहरात निर्जंतुकिकरण कक्ष उभारले. पीपीई किटचे वाटप केले. दारिद्र्रेषेखालील अंत्योदय कार्डधारकांचे रेशनचे पैसे भरले आणि तालुक्यातील प्रत्येक गावात फवारणी करण्यासाठी पंचायत समितीतून ग्रामपंचायतींना आदेश दिले. कारखान्याच्या सभासदांना मोफत सॅनिटायझर तर दिलेच पण पंचायत समितीतून ग्रामपंचायतींना मोफत सॅनिटायझर वाटप करण्यासाठी निधी वापरण्यासाठी आवाहन केले. याही पुढे जाऊन ग्रामपंचायतींना अत्यल्प दरात सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जे आज अनेक गावांमध्ये नागरिकांना मोफत मिळत आहेत. तसेच ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक कुटुंबाला वेळोवेळी मोफत सॅनिटायझर वाटप केले. गेल्या दीड ते दोन वर्षांच्या कोविड कालावधीत विकासकामांसाठी शासकीय निधी मिळेल का असा यक्ष प्रश्न पडलेला असताना ग्रामीण व शहरी भागाचा विकासात बाधा येऊ न देता नागरिकांच्या आरोग्यास प्राधान्य देऊन शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, १०० ऑक्सिजन बेड व बायपॅप मशीनची सुविधा, सरकारी तसेच कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन प्लांट उभारणी, नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रास मंजुरी, ग्रामीण रुग्णालयात नवीन ५० ऑक्सिजन बेडची सुविधा, ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर सुविधा, शहर व ग्रामीण भागाच्या विकासात महत्वाची भूमिका असणाऱ्या रस्त्यांच्या कामाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हे सर्व सुरू असताना माझ्या बळीराजाच्या शेतीला व पिण्याचे पाणी वेळेत मिळावे म्हणून गोदावरी कालव्यांची वहन क्षमता वाढविण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी, अशी एक ना अनेक कामे दादांनी नागरिकांसाठी केली आणि अविरत सुरु आहेत. एकीकडे विकासाची गंगा तालुक्यात आणत असताना सामाजिक जाणिवेतून कोविड आजाराने पतीचे निधन झालेल्या विधवा भगिनींना रोजगार व आर्थिक मदत म्हणून स्वतःचे आमदारकीचे वेतन देऊ केले, दिव्यांग बांधवांना दिव्यांग साहित्याचे वाटप केले. दिव्यांग प्रमाण नसल्याने शासकीय अनुदानापासून वंचीत असलेल्या दिव्यांग बांधवांना जिल्हा रुग्णालय येथे जाण्याकरिता सुविधा पुरवून तोही प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच कोविड कालावधीत योगदान देणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आशासेविका यांचा वेळोवेळी सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली व त्यांचा उत्साह वाढवला. अशा अडचणीच्या काळातही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एवढ्या मोठया प्रमाणात निधी खेचून आणणे म्हणजे यातून हे सिद्ध होते की आपल्याला नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे, त्यांच्या सुख सुविधांसाठी शासकीय निधीसाठी पाठपुरावा करणारे आमदार लाभले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे सर्व करत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणे, सूचना देणे, नागरिकांना आश्वस्त करणे हे तर सुरूच आहे.
*माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात तरी आशुतोषदादांएवढी नागरिकांची काळजी घेणारे दुसरे कोणी आमदार क्वचितच असतील. कोरोना असेल किंवा लॉकडाऊन असेल आपल्या या कुटुंबात दादांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आपल्या पाठीशी एक जबाबदार कुटुंब प्रमुख उभा असल्यावर कोपरगावच्या नागरिकांना घाबरुन जाण्याची गरज नाही. कारण तुमचा, माझा व आपल्या सर्वांचा मोठा भाऊ आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. आपण फक्त घरात राहून आणि प्रशासनाचे आदेश पाळून आपल्या या मोठ्या भावाला कर्तव्यपूर्तीसाठी साथ दिलीत, तो आपल्या या कुटुंबाला कधीही त्रास होऊ देणार नाही हा एका बहिणीचा ठाम विश्वास आहे.*
दादा गेल्या दीड ते दोन वर्षांपासून आपण स्वतःची पर्वा न करता या जीवघेण्या आजाराशी संघर्ष करून कोविड तालुक्यात आटोक्यात राहण्यासाठी प्रयत्नशील होतात यात आपल्याला यशही मिळाले. पण शेवटी या आजाराने आपल्याला गाठलेच. *दादा आपण तालुक्यातील नागरिकांच्या सुख – दुःखात सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहिलात. अशा वडीलधाऱ्या तसेच माता – भगिणींच्या आशीर्वादाच्या, तरुण व मित्र परिवाराच्या सदिच्छांच्या व आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर या आजारातून लवकरात लवकर बरे होऊन आपल्या इच्छेप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या व शिर्डी संस्थानचे माध्यमातून साईभक्त व साईबाबांच्या सेवेत रुजू व्हावे ही साई चरणी प्रार्थना.*