अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी- स्नेहलता कोल्हे
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी- स्नेहलता कोल्हे
कोपरगांव प्रतिनिधी :- सोमनाथ डफाळ
कोपरगांव शहर व मतदार संघात सलग दोन दिवस गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाची वाट लागली आहे. शेतकरी धायमोकलून रडत आहे, -असंख्य ठिकाणी सखल भागात गुडघाभर पाणी साठले आहे, घरांची पडझड होवुन संसारपयोगी साहित्याची हानी झाली तेव्हा शासनाने तात्काळ झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व त्याची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, महसुलमंत्री बाळासाहेब धोरात, कृषिमंत्री दादा भूसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले व तहसिलदार विजय बोरुडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, गुलाब चक्रीवादळ निर्माण झाल्यांने त्याचा तडाखा कोपरगांव विधानसभा मतदार संघातील बहुतांश गावांना बसला, सोमवार व मंगळवार सलग दोन दिवस ११० मिलीमिटरच्यावर पाउस झाला. या -अतिवृष्टीमुळे खरीपातील सोयाबीन, बाजरी, कापूस, लाल कांदा, फळबागा आदि काढणीला आलेल्या पिकांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ कांद्यासाठी रोपे टाकली त्याचेही अतोनात नुकसान झाले. असंख्य शेतक-यांचा उस शेतातच आडवा झाला आहे. त्यामुळे येथील शेतकरी धायमोकलून रडत आहे. या अस्मानी संकटामुळे खरिपा बरोबरच, रब्बी पिक नियोजनावर निसर्गाने पुर्णपणे वरवंटा फिरवला आहे. गेल्या दोन वर्षापासुन अगोदरच शेतकरी व सर्वसामान्य कोरोनामुळे अडचणींत आहे. आगास पिके आज पुर्णपणे पाण्यांत सडुन चालली आहे. अनेक ठिकाणी ओढया नाल्यांना पुर आले आहेत. सखल भागात पाणी साठले आहे., कोपरगांव शहराच्या खडकी तसेच ग्रामिण भागातील ब्राम्हणगांव, येसगांव येथे अनेक घरांच्या पडझडी होवुन संसारपयोगी साहित्याची हानी झाली आहे. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, तहसिलदार विजय बोरुडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन हाताळणा-या अधिकारी वर्गाला नुकसानीची पुर्वसुचना देवुन मदतीचे आवाहन केलेले आहे.
मागील वर्षी पर्जन्यमान चांगले झाले. पण चालु वर्षी उशीरांने पाउस झाल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरण्या शेतक-यांना कराव्या लागल्या, काहींनी पदरमोड करत, दाग _दागिने गहाण ठेवून खरीपाची पिके घेतली, पण सोमवारच्या अतिवृष्टी सुलतानी पावसाच्या संकटाने शेतक-यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. काढणीला आलेल्या पिकाच्या सोंगण्या कशा करायच्या हा प्रश्न निर्माण झाला आहे. जे पीक हातात येणार होते त्याचाही घास अतिवृष्टींने घेतल्याने शेतकरीराजा आणखीनच संकटात सापडला आहे. तेव्हा शासनाने तातडीने या शेतक-यांचे झiलेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून त्याची भरपाई तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करावी तसेचअतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे, वाहतुकीस अडथळा होत आहे, सखल भागात पाणी वाहून जाणारी यंत्रणा नसल्याने खड्ड्यांचे प्रमाण वाढत आहे, तेव्हा शासनाने रस्ता दुरुस्तीकडेही विशेष लक्ष पुरवावे व त्यांच्या दुरुस्तीसाठी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे असेही सौ कोल्हे म्हणाल्या.