तलावाच्या वेळी पैसे वाचविण्याचा विचार का नाही केला? – वाल्मिक लहिरे
तलावाच्या वेळी पैसे वाचविण्याचा विचार का नाही केला? – वाल्मिक लहिरे
कोपरगाव प्रतिनिधी – ज्यांना विकासकामे करायची नव्हती त्यांनाच त्यावेळी विकासकामात भ्रष्टाचाराचा वास येत होता व पैशाची उधळपट्टी होत असल्याचा साक्षात्कार झाला. त्या क्रीडा संकुल पळवणाऱ्यांनी जलतरण तलावाच्या वेळी पैसे वाचविण्याचा विचार का नाही केला? असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे यांनी केला आहे.
२८ विकासकामांना विरोध करणाऱ्या सत्ताधारी कोल्हे गटाकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी थांबवली म्हणूनच उर्वरित पैशात अन्य विकास कामे मार्गी लागली अशा आशयाची पत्रकबाजी करून नेहमीप्रमाणे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. त्याचा वाल्मिक लहिरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, विकासाची मानसिकता नसलेल्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना नेहमीच साक्षात्कार होत असतात त्यापैकी हा एक साक्षात्कार असून त्यांना विकासकामे करताना पैशाची उधळपट्टी होताना दिसत आहे. त्यांना पाच वर्षात विकास आणि उधळपट्टी यातील फरकच समजलेला नाही. त्यामुळे कोणीतरी काहीतरी सांगायचे आणि पत्रकबाजी करायची असा एककलमी कार्यक्रम सध्या विरोधकांचा सुरू आहे. विकासाची मानसिकता नाही, पाच वर्षात विकासाची दिशा सापडली नाही, विरोधाला विरोध करायचा म्हणून २८ कामांना विरोध करून बसले. एवढ्यावरच न थांबता या विकास कामांना न्यायालयात जाऊन स्थगिती आणली. हे कर भरणाऱ्या नागरीकांना अजिबात रुचलेलं नाही. त्यामुळे शहरवासियांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून येणाऱ्या निवडणुकीत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे पानिपत होते की काय? या चिंतेने विरोधक ग्रासले आहे. त्यामुळे सारवासारव करण्यासाठी त्यांना उधळपट्टीचा साक्षात्कार झाला आहे. मात्र ज्यांनी नागरीकांसाठी बांधलेल्या जलतरण तलावात आज डुकरे पोहोत आहे. त्यामुळे जलतरण तलावासाठी खर्च केलेला निधी हा पूर्णपणे वाया गेला ही खरी पैशाची उधळपट्टी आहे. त्यामुळे ज्यांनी कोपरगावचे क्रीडा संकुल पळविले त्यांनी जलतरण तलावाच्या वेळी पैसे वाचविण्याचा विचार का नाही केला? असा सवाल वाल्मिक लहिरे यांनी केला आहे.