आपला जिल्हामहाराष्ट्र
आमदार काळे यांनी जनतेला दुषित पाणी पाजण्याचा हट्ट सोडावा
आमदार काळे यांनी जनतेला दुषित पाणी पाजण्याचा हट्ट सोडावा
कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ
राष्ट्रीय हरित लवादाने गोदावरीचे पाणी दूषित असल्याचा निर्वाळा दिला आहे तेव्हा आमदार आशुतोष काळे यांनी निळवंडे पाणी योजनेला विरोध करू नये लवकरात लवकर कामाला सुरुवात करून साई भक्तांसह कोपरगावकरांना हे पाणी तातडीने द्यावे अशा आशयाचे पत्रक भाजप गटनेते रवींद्र पाठक व शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
ते पुढे म्हणाले की, अबाल वृद्ध महिला भगिनी या अतिशय विश्वासाने स्वच्छ पाणी आपल्याला मिळावे याकडे आस लावून असतांना केवळ विशिष्ट भूमिका ठेऊन चांगल्या योजनांना विरोध करण्यासाठी माणसे पेरण्याचे पाप लोकप्रतिनिधी करत आहेत का असाही प्रश्न पडतो.श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून निळवंडे शिर्डी कोपरगाव ही पाणी योजना पूर्णत्वास जाण्यासाठी आमदार काळे यांनी आजवर काहीही मनाचे मोठेपणा दाखवला नाही हे शल्य नागरिकांना कायम आहे.जनतेच्या जिवापेक्षा कोणतीही सत्ता मोठी नसते त्यामुळे माजी आमदार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी निळवंडे पाणी योजनेसाठी सर्व कार्यवाही करून ठेवली आहे मात्र न्यायालयीन अडसर आणून या योजनेत विरोधकांनी खोडा घातला नसता तर एव्हाना हे पाणी कोपरगावच्या नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध झालेले असते.
विद्यमान आमदार महोदयांनी गोदावरीच्या पाण्याचा हट्ट करण्यापेक्षा जनतेला पिण्यायोग्य पाणी मिळावे यासाठी आता तरी या निर्णयामुळे सावध व्हावे असे वाटते.सत्ता व राजकारण हे चंचल आहे,ते सर्वस्व नाही तर आपल्या नागरिक बांधवांचा जीव जास्त मोलाचा आहे.
गोदावरी नदीच्या पात्रात प्रक्रियारहित सांडपाणी मिसळते हे पाणी नागरिकांच्या जीवाशी खेळ होण्यास पात्रात जाते आहे.या खराब पाण्याचा वापर होऊ शकत नाही असे भीषण सत्य आहे.विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र सत्याकडे डोळेझाक करून सत्तेचे पाणी डोळे मिटून पित आहे तर जनतेला दुषित पाणी पाजून कोपरगाव वासियांच्या जीवाशी खेळत आहे.
पाणी हे जीवन आहे मात्र सत्तेच्या धुंदीत जनतेला दुषित पाण्याचा घोट रोज पाजण्याचे धारिष्ट्य दाखवले जात आहे.निळवंडे योजनेला विरोध करून आपल्याच कुटूंबियांना व नागरिकांना पाणी नव्हे तर दुषित पाणी रोज देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना श्री साईबाबा सद्बुद्धी देवोत व कोपरगावकरांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय लवादाच्या स्पष्टीकरणाचा धडा आता तरी आमदार काळे यांनी घ्यावा असे शेवटी रविंद्र पाठक व योगेश बागुल यांनी म्हटले आहे.