आपला जिल्हा

शांत, संयमी नेतृत्व, प्रगल्भ वैचारिक व्यक्तिमत्व म्हणजे बापू

शांत, संयमी नेतृत्व, प्रगल्भ वैचारिक व्यक्तिमत्व म्हणजे बापू

(लेख क्रमांक १८)

बापू, होऽऽ बापूंच! दचकलात का?, थांबा! स्पष्ट करून सांगतो. म्हणजे आपल्या प्रतेकाला बापू म्हटलं की आठवतात ते राष्ट्रपिता महात्मा गांधी, बरोबर ना!, पण मी ज्यांच्या विषयी लिहीतो आहे. ते गांधीजी नव्हे बरं का. पण त्यांचेच वारसदार वाटावे असे स्वभावाने, गुणांनी नक्कीच आहेत. बापू म्हणजे आमच्या आदर्शगाव सांगवी भुसार चे आदर्श नेतृत्व आदरणीय श्री राजेंद्र (बापू) पंडितराव जाधव होय.


बापूंना नेतृत्व गुण वारसा हक्काने मिळाले असे म्हणता येईल, कारण त्यांचे वडील आदरणीय श्री पंडितराव (आण्णां) जाधव हे राजकारणातील मोठं नाव, कोपरगाव सारख्या मातब्बर विधानसभेची निवडणूक जनता पक्षाचा उमेदवार म्हणून १९७८ या वर्षी लढवलेले लोकप्रिय नेते. त्यांचे जेष्ठ चिरंजीव राजेंद्र बापू आहेत. पंडितराव आण्णांना विधानसभेला मोठा जनाधार मिळाला होता. आजही अनेक लोक राजकारण करावं तर ते आण्णांनीच असं आवर्जून म्हणतात. असो.
बापू हे पंडितराव आण्णांचे जेष्ठ चिरंजीव, द्वितीय संजय जाधव ( ते आज आपल्यात नाहीत) तृतीय चिरंजीव विजय अर्थात नानाभाऊ होय. ते नानाभाऊ याचं नावाने अधिक फेमस आहेत. या तीनही भावां विषयी एकाच लेखात लिहीने खरंच शक्य नाही, कारण प्रतेकाच कर्तृत्व खूप मोठं आहे. राजकारण आणि समाजकार्यात प्रत्येकाने वेगळी ओळख निर्माण करून कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. प्रतेकाने आपलं वेगळेपण जपत यश मिळवले आहे, आज बापूंचा वाढदिवस असल्याने सध्या आदरणीय, सन्माननीय बापूंच्या जीवना विषयी थोडी माहिती लिहीतो आहे.


आदरणीय पंडितराव आण्णांचा राजकारणातील अगदी उमेदीचा काळ, राजकीय व्यस्ततेमुळे सारखी धावपळ सुरू असायची. कुटुंबाची सर्व जबाबदारी येऊन पडली ती मातृवत्सल लिलाबाई पंडितराव जाधव यांच्यावर, त्यांनीही ती नेटाने, जबाबदारीने, यशस्वीपणे सांभाळली. आण्णांना खंबीरपणे साथ दिली. या सुखी,समाधानी कुटुंबात आनंदाची वार्ता आली. सोन पावलांनी वैभव घराण्यास प्राप्त झाले. दिनांक २३ नोव्हेंबर १९५५ रोजी राजेंद्र बापूंचा जन्म झाला. संपूर्ण गावात पेढे वाटून आनंद साजरा केला होता. अशी आठवण वयस्कर मंडळी सांगतात. होय वाचक हो आज आपल्या लाडक्या बापूंचा वाढदिवस आहे. आदरणीय बापूंच्या वाढदिवसा निमित्त लेख लिहीण्याचा प्रयत्न करताना मला खूप आनंद होत आहे. प्रतिष्ठित, किर्तिवंत जाधव घराण्यात जन्म घेतलेला हिरा जस जसा मोठा होत गेला, तस तसा आपल्या बुध्दिमत्तेने, समंजस, संस्कारी वर्तनाने सर्वांचा लाडका होतं होता.
राजेंद्र बापूंचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी भुसार मध्ये चौथी पर्यंत झाले. तेव्हा या शाळेतील आसाराम मिसाराम पाटील गुरूजी आणि सोनार गुरूजी नेहमी त्यांच्या हुशारीचे गोडवे गात होते. म्हणुनच वर्ग शिक्षक सोनार गुरूजींनी चौथी च्या स्काॅलर शीप परीक्षेसाठी राजेंद्र जाधव आणि लहानू माळी या दोन गुणी विद्यार्थ्यांची निवड केली होती. ती स्काॅलर शीप परिक्षा अहमदनगर ला झाली, त्या एका दिवशी बापूंची ओळख माननीय रमाकांत आदिक साहेब, पंडित भाऊ चांदगूडे आणि प्रकाश दादा चांदगूडे यांच्या सोबत झाली. पुढील माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी प्रवरा पब्लिक स्कूल लोणी येथे बापू गेले असताना त्यांची योगायोगाने वर्गमित्र म्हणून पुन्हा भेट झाली. सोबत शिक्षण घेत असताना हे तिघेही बापूंचे जीवलग मित्र झाले. मनमिळाऊ स्वभावामुळे अनेक मित्र त्यांनी या काळात जोडले. आता सर्वांना परिचित असलेले आदरणीय नितीन दादा कोल्हे, आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे सुध्दा शालेय जीवना पासून चांगले मित्र झाले.
सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले बापू मनमिळाऊ स्वभावामुळे अनेकांना आपलेसे करून घेत. म्हणून त्यांची मैत्री तळागाळातील सर्वंच समाजातील मुलांसोबत झाली. ती त्यांनी आपुलकीने जपली, सांभाळली. माणसं कशी जोडावी याचे मुर्तिमंत उदाहरण आणि धडा त्यांना पंडितराव आण्णांच्या रूपाने घरातच जवळून अनुभवता येतं होता. बाईंच्या लाडात वाढले असले तरी शिस्त आणि स्वच्छता या विषयी सजगता माऊलींने अंगी रुजवली होती. गोर गरिबांच्या लेकी, सुना बाईंकडे कुटुंबातील, गावातील अनेक समस्या घेवून येत. त्या सोडवण्यासाठी वापरलेल्या युक्त्या सहजपणे बापूंना आत्मसात करता आल्या. म्हणून तर आजही त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून मृदू, हळवं मातृ ह्रदय बोलतं असतं, यांचा अनुभव मला आणि गावातील सर्वांना त्यांच्या सोबत चर्चा करताना जाणवतं राहते. समस्या कितीही मोठी उभी राहिली तरी त्यांचा संयम कधी ढळला असे कुणाच्याही ऐकण्यात नाही.
बापूंनी काॅलेज चे शिक्षण सर्वांना परिचित अशा SSGM काॅलेज कोपरगाव मध्ये घेतले. तेंव्हा पासून आपल्या नेतृत्व गुणांची झलक त्यांनी दाखवली होती. F Y B Sc ला असताना ते CR झाले होते. अशी आठवण त्यांचे वर्ग मित्र रवंदे शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री म्हस्के सरांनी सांगितली. सर्व वर्ग मित्रांना त्यांचा स्वभाव भावला होता. तसेच त्यानी आपल्या बुध्दिमत्तेने गुरुजनांचा विश्वास जिंकला होता.
पुढिल उच्च शिक्षण MA करण्यासाठी फर्ग्युसन काॅलेज पुणे येथे प्रवेश घेतला. तेथे नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांची मैत्री झाली. तसेच सन्माननीय मनोहर त्रिभूवन हेही त्यांचे वर्गमित्र पुढे जाॅईंट कमिशनर झाले आणि सन्माननीय सुभाष येवले साहेब हे वर्ग मित्र पुढे मंत्रालयात सचिव झाले.
पदवीचे शिक्षण त्यांनी गव्हरमेंट लाॅ काॅलेज मुंबई ची निवड करून LLB चे शिक्षण पुर्ण केले. आपल्या बुध्दिमत्तेच्या जोरावर त्यातही यशस्वी झाले. तेथील वर्गमित्रांनी सुध्दा त्यांना CR म्हणून निवडून आणले होते. सध्याचे महाराष्ट्र सरकार मधील गृहमंत्री मा.श्री दिलीप वळसे पाटील तसेच श्री सुनिल आठरे साहेब हे त्यांचे गव्हरमेंट लाॅ काॅलेज मधील वर्ग मित्र आहेत. दिलीप वळसे पाटीलांनी त्यांची लोकनेते शरद पवार साहेबां सोबत ओळख करून दिली होती.


राजेंद्र बापूंनी वकीलीची प्रॅक्टीस हायकोर्टातील नामवंत वकील सी. जे. सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केली. प्रतिष्ठित वकील बॅरिस्टर रामराव आदिक साहेबांचा सहवास व मार्गदर्शन त्यांना लाभला होते. औरंगाबाद हाय कोर्टातील प्रथितयश वकील रमेश धोर्डे साहेब आणि वकील विनायक होण साहेब आदी सहकारी वकील मित्रांनी सोबत प्रॅक्टीस केली होते. खरं तर अनेक नामवंत, मुत्सद्दी, वर्ग मित्र त्यांना त्या वयात लाभले त्यामुळे आजही मंत्रालयातील अनेकजण त्यांना नावानिशी ओळखतात. इतकंच नाही तर आज रोजी त्यांचे सुप्रीम कोर्टात तीन वर्गमित्र न्यायाधीश आहेत आणि सात वर्गमित्र उच्च न्यायालयात न्यायाधीश सुध्दा आहेत. अनेक उच्च पदावरील शासकीय अधिकारी त्यांचे वर्ग मित्र आहेत. इतक्या ओळखी असुनही बापूंनी आपल्या मैत्रीचा गैरवापर केला कधी नाही. आयुष्यात अनेक खडतर प्रसंग उदभवले तरीही आपले तत्व आणि निष्ठा कधी ढळू दिली नाही. म्हणून तर तालुकाच नव्हे तर राज्याच्या राजकारणात स्व पक्षातील, मित्र पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेते आदरणीय श्री राजेंद्र बापू जाधव यांचं गुणगान केल्या शिवाय रहात नाही.
कोपरगाव हा राजकारणात मुरब्बी तालुका असून सुद्धा बापूंच्या नेतृत्वामुळे सांगवी भुसार या गावाचे वेगळे पण आबाधित राहीले. अनेक वेळा ग्रामपंचायत बिनविरोध करून दाखवली. म्हणूनच गावातील लोक निवडणूकी पुरता विरोध करतं असले तरी, बापूंच्या शब्दा बाहेर नाही याचा अनुभव मी गावचा नागरिक म्हणून अनेकदा घेतला आहे. संत गाडगे बाबा अभियाना द्वारे गावाच्या विकासाची दिशा पकडून राज्यस्तरीय , जिल्हा स्तरीय, विभागीय अनेक पुरस्कार मिळवून दिले. राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मलग्राम पुरस्कार मिळाला. इतके पुरस्कार मिळाले पण कधीच स्वतः पुढे आले नाही. आपल्या गावातील सर्व सामान्य माणसांना मोठं करतं राहीले. त्यांचा सन्मान होतांना पाहून आनंदित होणारा नेता आजकाल सापडणे दुर्मिळ आहे.
खऱ्या अर्थाने बापूंच्या राजकीय वाटचालीची सुरूवात १९८५ या साला पासून झाली. या वर्षी बहुमताने निवडून येत ते सांगवी भुसार या ग्रामपंचायत चे सरपंच झाले. अनेक योजना गावात यशस्वीपणे राबवून तालुक्यात ओळख निर्माण केली. यातील नळ पाणी योजनेचे १ कोटी ७८ लाखांचे कामं एका छोट्या गावासाठी मंजूर करून आणले. खऱ्या अर्थाने सांगवी भुसार गावातील लोकांचा पाणी प्रश्न सोडवला. हापश्या वरून पाणी वाहून आणण्याचा त्रास कायमचा संपला. अशा कामगीरी मुळे लौकिक वाढू लागला. मग १९८९ साली गोदावरी दुध संघावर संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. आदरणीय नामदेवराव परजणे आण्णांच्या सहवासात मार्गदर्शनाने तालुक्यातील राजकारणात वेगळा ठसा निर्माण केला. परजणे आण्णांचा इतका विश्वास बसला की त्यांनी गोदावरी दुध संघ या नावाजलेल्या संस्थेचे चेअरमन पद बापूंना दिले. त्या काळात अनेकांनी ही ऐकी तोडण्याचा प्रयत्न केला. पण बापूंनी पद, पैशासाठी कधीच दगाबाजी केली नाही. अनेक संधी ठोकरून दिल्या परजणे आण्णांची साथ सोडली नाही. आजच्या काळातील राजकारणी मंडळींनी बापूंचा आदर्श घ्यायला हवा.
बापूंची काँग्रेस पक्षा सोबत बांधिलकी जोडली गेली. पक्षाने त्यांची कार्य करण्याची पध्दत आणि क्षमता ओळखली. जबाबदारी वाढवून त्यांना जिल्हा प्रवक्ते, जिल्हा सरचिटणीस, तालुका अध्यक्ष या सारख्या महत्वाच्या पदांवर काम करण्याची संधी दिली गेली. या पदावर असताना पक्षाला बळकटी देण्याचं काम त्यांनी मेहनतीने केले. विविध पदावर काम करत असताना कुठलाही आरोप त्यांच्यावर झाला नाही. यातच त्यांच्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाचं मोल लक्षात येते. वैचारिक प्रगल्भ व्यक्ती म्हणून मोठा वर्ग बापूंना मानणारा आहे. खुन्नसीचे राजकारण कधीही न करणारे बापू त्यामुळेच सर्वाहून वेगळे ठरतात. समन्वय आणि सन्मान हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा भाग झाले आहे. पातळी सोडून कुणावर टिका न करणारे बापू म्हणूनच महात्मा गांधी चे वारसदार ठरतात. असे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.
कौटुंबिक नाते संबंधा बाबतीतही त्यांचा मोठा परिवार आहे. मी मुद्दाम त्या विषयी अधिक लिहीणार नाही,(तसा तो तुम्हाला माहित आहेच) कारण त्यांनी कधीही त्याचा बडेजाव करतं ताकद दाखवली नाही, किंवा रूबाब गाजवला नाही. एक सर्व सामान्य कार्यकर्ता म्हणूनच पक्षाचे काम करतं राहीले. परिवाराच्या बळावर अनेक मोठया संधी त्यांना मिळाल्या सुध्दा असत्या, पण त्यांनी आपला स्वाभिमान जपला, निष्ठा जपली. म्हणूनच नाते संबंधाचा विषय मी टाळतो आहे. माझ्या सारखा एखादा याचा फायदा घेऊन उन्मत्त झाला असता. बरोबर ना!. साधा सरकारी ऑफिस मधला शिपाई आपल्या ओळखीचा असला तरी आपण छाती फुगवून सांगतो. तिथं मंत्रालयात दोन तीन मंत्री संबधातील आणि पाच सहा आमदार मित्र असतिल तर!. असो.
जेव्हा जेव्हा कै.नामदेवराव परजणे आण्णांचा विषय निघतो, तेंव्हा तेंव्हा बापू अधिक भावुक झालेले आम्ही पाहीले आहे. पंडितराव आण्णांनी जेवढे प्रेम दिले तसेच प्रेम परजणे आण्णांनी वडिलांसारखे प्रेम दिले आणि विश्वास ठेवला. दुर्दैवाने आण्णांना कमी आयुष्य मिळाले. आजही आदरणीय राजेश आबांकडून भावा सारखे प्रेम मिळते. आणि शालिनी ताई (अक्का) बापूंना बहिणी सारखी माया लावतात.परजणे आण्णा आजारी असताना बापू गोदावरीचे चेअरमन होते. आण्णांच्या डोळ्या समोर त्यांचा मुलगा सन्माननीय राजेश आबा परजणे यांना गोदावरी दुध संघाच्या चेअरमन पदी बसवावे हा विचार बापूंच्या मनात आला आणि तो लगेच आमलातही आणला. कारण परजणे आण्णांच्या ह्रदयात बापूंना आपल्या मुला प्रमाणेच स्थान होते. मग मुलगा म्हणून कर्तव्यात कसूर कशी होणार?. आजही गोदावरी दुध संघावर बापूंना तितकाच सन्मान दिला जातो. यातच त्यांच्या कार्याच, निष्ठेचे महत्व अधोरेखित होते. आदरणीय राजेश आबा परजणे आणि आदरणीय राजेंद्र बापू जाधव ही जोडी राजकारणात आपलं वेगळे पण जपून आहेत. भल्या भल्याना त्यांच्या वैचारिक राजकारणाने धडकी भरते हे नाकारता येणार नाही. आपली नांव कडेला नेण्यासाठी या जोडीला सोबत घेतल्या शिवाय गत्यंतर नाही हे आता प्रतेकाला कळून चुकले आहे.
आदरणीय बापूंना महानंदा दुध संघ मुंबई चे संचालक म्हणून पद मिळाल्यावर ते वलयांकित झाले. आमच्या गावचे साहित्यिक नंदकिशोर लांडगे यांनी त्यावेळी त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी पुरवणी सकाळ या नावाजलेल्या वर्तमानपत्रात लिहीली होती. ती मी या लेखा सोबत जोडली आहे. पुढे राजेंद्र बापू जाधव यांची क्षमता, कौशल्य ओळखून माननीय नामदार अजित दादा पवार साहेब, नामदार जयंत पाटील साहेब, नामदार बाळासाहेब थोरात साहेब, नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी त्यांची महानंदा दुध संघाचे व्हाईस चेअरमन म्हणून नियुक्ती केली. नावलौकिक प्राप्त संस्थेच्या माध्यमातून श्री राजेंद्र बापूंना काम करण्याची संधी मिळाली. तीही बापूंनी प्रामाणिक पणे पूर्ण केली. दुध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व सहकार्य करतं राहीले. आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला. राज्यमंत्री दर्जा असलेले हे पद सांभाळत असताना सुद्धा गावा विषयी त्यांची ओढ कमी झाली नाही. मोठं पद मिळाल्यावर सुध्दा आपली माणसं सांभाळण्याची त्यांची शैली कुणालाही सहज जमण्यासारखी नाही.
वाढदिवसाच्या या लेखात मी माझ्या सहकारी साहित्यिकांच्या प्रतिक्रिया आवर्जून देतं आहे. कारण आदरणीय बापूं हे व्यक्तीमत्व शब्दांत उतरवन वाटतं तितकं सोपं मुळीच नाही. त्यांच्या विचारांचे आचरणाचे असंख्य पैलू समोर उभे करतांना मती गुंग होते. पहिली प्रतिक्रिया कवी नंदकिशोर लांडगे यांनी दिली ती त्यांच्याच शब्दात देतो आहे.
“कोपरगाव तालुक्यात आदाराने व आपुलकीने ज्या व्यक्तींचा उल्लेख केला जातो, त्यापैकी एक नाव म्हणजे सांगवी भुसार गावाचे सुपुत्र व महानंदाचे (मुंबई ) मा व्हा चेअरमन श्री अँड. राजेन्द्र बापू जाधव. मुखात गोडवा, माधुर्य, बोलण्यात विनयता,संयम व वागण्यात नम्रता असेल तरच, अशा माणसांच्या प्रेमात लोक पडतात किंबहुना असेच माणसं आपल्या जीवनात यशस्वी होताना दिसतात. नव्हे अशाच माणसांचा यश पाठलाग करीत असते. सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सरकारी गाडी व त्यावर सरकारी दिवा असलेले पद मिळाले तर राजकिय जीवन यशस्वी मानले जाते. एरव्ही राजकारणात शासकिय दिवा मिळवण्यासाठी अनेक राजकीय रुसवेफुगवे आपल्याला ऐकायला मिळतात, परंतु कर्तृत्व निर्मळ व हेतू प्रामाणिक असेल तर कोणतेही गोष्ट अशक्य नाही हे राजेंद्रबापुंकडे पाहिल्यावर प्रखरतेने आपल्या लक्षात येते.
बापुंची राज्य मंत्री पदाचा दर्जा असलेल्या महानंद दुध संघाच्या व्हा. चेअरमन पदावर निवड झाल्यावर, शासकीय दिवा असलेली सरकारी गाडी सलगपणे चार वर्षे मिळाली. बहुतेक सलग चार वर्षे या पदावर राहण्याचा बहुमान बापुंना मिळालेला आहे, परंतु ऐवढे वैभव प्राप्त झाल्यावरही कायम जमिनीवर पाय ठेवून वाटचाल करणारे बापुं सध्याच्या व भविष्याच्या राजकारणासाठी एक मार्गदर्शक उदाहरण म्हणून दिपस्तंभा सारखे राहिले यात शंकाच नाही. सत्तेच्या सहवासात चांगली चांगली माणसं बदलतांना दिसतात, हा सत्ता सुंदरीचा चमत्कार असतो. मात्र बापुंच्या कथनी आणि करणीत कधीच फरक जाणवतांना दिसला नाही. तत्व आणि विचारांची कधी फारकत होतांना दिसत नाही.
नेहमी मुंबईवरुन आपल्या सरकारी गाडीतून नाशिकमार्गे आपल्या गावाकडे येताना विंचुरजवळ आल्यावर ड्रायव्हरला गाडी थांबायला लावून, गाडीवर असलेला दिवा काढायला सांगून गाडीत ठेवायला लावत, मगच आपल्या गावात आणि घरी येत. घरी आल्यावर सुध्दा कोपरगाव तालुक्यात फिरताना सरकारी गाडीचा वापर न करता आपली स्वतःची खाजगी गाडी वापरत. ऐवढे वैभव प्राप्त असतांनाही नेहमी सर्व सामान्य जीवन जगणारे, सर्व सामान्यात वावरणारे, लोकांच्या सुखदुःखात नेहमी धाऊन जाणाऱ्या बापुं विषयी मी एवढंच म्हणेन राजकारणात असुनही एक सरळ, प्रामाणिक राजकारणी तुमच्या सारखा सापडणे दुर्मिळच. आदरणीय बापुंना वाढदिवसानिमित्त, निरोगी व उदंड आयुष्य लाभो हिच मनापासून शुभेच्छा. 🙏कवी नंदकिशोर लांडगे 🙏
या उत्तम प्रतिक्रियेनंतर अजून एक साहित्यिक कवी विलास बगाटे यांची सुंदर प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात देतो आहे.
“माझ्या आयुष्यातील एक लहानपणीचा किस्सा मी कदाचित इयत्ता तिसरी किंवा चौथीत असेन. राजेंद्र बापू जाधव हे तेंव्हा बुलेट गाडी वापरत, त्याचं आम्हाला जास्त अप्रूप वाटे. त्याच गोष्टीचा परिणाम माझ्या मनावर झाला. शाळेत इन्स्पेक्शन घेण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी एक प्रश्न विचारला “भारताचे पंतप्रधान कोण आहेत? मी लगेच उत्तर दिले होते “राजेंद्र बापू जाधव” एवढा पगडा माझ्यावर राजेंद्र बापू यांच्या व्यक्तिमत्वाचा पडला होता.
बारावीच्या वर्गात गेलो होतो तेंव्हा कॉलेजमध्ये उन्हाळ्याची सुट्टी न देता बारावी सायन्स चे कंटिन्यू क्लासेस घेत होते. मी आणि दत्तू कासार आम्हाला बसचे पासेस मिळाले नाही. बसचे तिकीट एका बाजूने ७ रुपये याप्रमाणे येणे जाणे मिळून १४ रूपये लागत होते. राजेंद्र बापू जाधव हे त्यावेळेस नुकतेच गोदावरी दूध संघाचे व्हाईस चेअरमन झाले होते. त्यांना आमची अडचण लक्षात आली असावी म्हणून रोज गाडी थांबवून आम्हाला काॅलेजला घेऊन जात होते. दत्तू कासार आणि मी घरची गाडी आम्हाला सोडवायला येते अशा ऐटीत गाडी मधून उतरत असायचो. सलग दोन महिने बापूंनी आम्हाला शिक्षणासाठी केलेली मदत कधीच विसरता येणार नाही. पंडितराव आण्णांनी ज्याप्रमाणे शिक्षणासाठी गावातील अनेक मुलांना मदत केली तोच वारसा बापूनी सुध्दा जोपासला आहे. एफ वाय बी एस सी ला असताना माझे “पहावे प्रेम करून एकदा” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर माझी हस्तलिखित कादंबरी वाचनासाठी बापूंनी घेतली होती. बापूंना साहित्य वाचनाची खूप आवड आहे, हे तेंव्हा मला कळाले होते. बापूंचे मराठी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे त्यांच्या भाषणातून ते अनुभवास येते.
आज बापूंना वाढदिवसाच्या निमित्ताने या आठवणी कृतज्ञतेने व्यक्त कराव्यात असे वाटले. सन्माननीय राजेंद्र बापूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 कवी, लेखक विलास बगाटे 🙏
आमचे मित्र मोहन कासार यांची मनाला भावलेली प्रतिक्रिया आवर्जून द्यावीशी वाटते.
आमच्या गावचे आधारस्तंभ राजेंद्र बापु जाधव महानंदाचे उपाध्यक्ष असताना त्यांनी दुधाचे टेट्रापॅक नावाने नवीन ब्रँड ची सुरुवात केली होती. त्यावेळी मुंबई येथील भव्य कार्यक्रमाला आदरणीय लोकनेते नामदार श्री शरदराव पवार साहेब आणि अनेक वरिष्ठ नेते मंडळी हजर होती. त्या कार्यक्रमासाठी सांगवी भुसार गावकऱ्यांना आग्रहाचं निमंत्रण बापूंनी दिले होते. आम्ही मुंबईला पोहोचल्यावर बापूंनी आमची भेट घेऊन आपुलकीने प्रवासा बद्दल चौकशी केली. यथोचित पाहुणचार झाला. त्यांच्या केबिनमध्ये आम्हाला घेऊन गेले. लोकनेते आदरणीय श्री शरद पवार साहेबां सोबत व्यासपीठावर बसलेले बापूंना पाहून सर्व ग्रामस्थांना खूप आनंद झाला. ग्रामस्थांनी बापुंचे कौतुक केले, बापुंचा येथोच्छित सन्मान होतांना बघुन गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला होता.
आदरणीय राजेंद्र बापूंना आज वाढदिवसाच्या मनापासून खूप शुभेच्छा 🙏 मोहन कासार 🙏
आदरणीय राजेंद्र बापू विषयी अशा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या असत्या कारण बापूंचे व्यक्तिमत्व आदर्श आहे. मला बापूं विषयी हि सर्व माहिती त्यांच्या परस्पर गोळा करत असताना त्यांच्या असामान्य कर्तृत्वाचा खूप अभिमान वाटला. कदाचित त्यांच्या कडून माहिती घेतली असती. व्यक्तिमत्वाचे अधिक बारकावे मांडता आले असते. आपल्या आसपास वावरणारे बापूंना किंवा असे अनेक चेहरे जे आपण अज्ञानाने दुर्लक्षित करत असतो. माझे मित्र कवी नंदकिशोर लांडगे आणि कवी विलास बगाटे यांनी मला गावातील घटना आणि व्यक्ती यांच्या विषयी लिहीण्यासाठी प्रेरित केले म्हणून आज मला राजेंद्र बापू जाधव थोडे फार समजले. कदाचित तुम्हाला याहून अधिक ज्ञात असतिल.
अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या आदरणीय राजेंद्र बापू जाधव यांना वाढदिवसाच्या या लेखाद्वारे ह्रदयातून खूप खूप शुभेच्छा देतो.🎂💐🙏
🙏थांबतो धन्यवाद 🙏

कवी लेखक पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
जि अहमदनगर
७९७२५२३७१७

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे