महाराष्ट्र

आपल्या माणसांची कौतुकाची थाप (लेख क्रमांक १५)

आपल्या माणसांची कौतुकाची थाप
(लेख क्रमांक १५)

कोपरगाव प्रतिनिधी : खरं तर मी नेहमीच जुन्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण आज नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमा विषयी लिहीतो आहे. त्याचं कारण हा सोहळा चिरःकाल स्मरणात रहावा हेच आहे. सोबतच एखादं संकट येऊन गेल्यानंतर पुन्हा आपली माणसं, आपलं गांव उभ राहिले पाहिजे. विकासाची दिशा नव्याने उभारता आली पाहिजे, यासाठी केलेला हा प्रयत्न म्हणजे दिशादर्शक ठरवा म्हणून या लेखातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.


नेहमी प्रमाणे कामात व्यस्त असताना फोन आला की आपण तो घेणं टाळतो. पण फोन करणाऱ्या व्यक्तीच नांव बघताच आनंदाला उधाण यावं तसंच काहीसं माझं सुध्दा झालं. नोकरी निमित्त गांव सोडून शहरात आलेल्या प्रतेकाला आपल्या गावातील माणसांची आठवण येत असते, पण बोलणं फारसं होतं नाही. अशात आपल्या गावातील सर्वांत प्रतिष्ठित, आदरणीय आणि आपुलकीच्या माणसाचा तो फोन असला तर ! आश्चर्य वाटणं साहजिक आहे. तसाच आनंद होणं ही आलंच नाही का !
आमच्या सांगवी भुसार गावचे लोकनेते, मार्गदर्शक महानंदा दुध संघाचे माजी व्हाईस चेअरमन श्री राजेंद्र बापू जाधव यांचा फोन आला. म्हणजे जराशी भिती आणि हुरहुर होतीच. नेमकं काय असेल बरं वाटलं, कारण मी लिहीत असलेल्या लेख मालिकेत तर काही चुकलं नसेल ना? असाही प्रश्न मनात येऊन गेला. पण झालं भलतंच, कारण त्यांनी १५ ऑगस्ट या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आवर्जून आमंत्रण दिलं. इतकं कमी की काय आपल्या गावातील सर्व साहित्यिकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. तेव्हा तू आवर्जून आलंच पाहिजे, म्हटल्यावर किती आनंद झाला असेल ते शब्दांत सांगणं कठीण आहे. साहित्य सेवा करत असताना प्रतेक लेखक, कवी ला वाटतं असतं कि आपलं हे काम पाहून आपल्या गावातील, जवळच्या माणसांनी त्याचं कौतुक करावं. पण ते भाग्य इतक्या लवकर मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं.” तू लिहित असलेल्या कविता, लेख आम्ही आवर्जून वाचतो. तुम्ही तरूण मुलं साहित्यिक म्हणून करत असलेल्या कामाचा मला आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटतो”. हे शब्द आयुष्यभर कानात घुमत राहतील असेच आहेत. आदरणीय बापूं हे स्वतः राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव आहे. तरीही त्यांच्या बोलण्यातून आत्मियता, शब्द माधुर्य प्रकर्षाने जाणवते. गावात घडणाऱ्या लहान सहान गोष्टी कडे त्यांचं लक्ष असते. जिथं मदतीची गरज असेल तिथे मदत करणं, जिथे सांत्वनाची गरज असेल तिथे सांत्वन आणि जेव्हा एखादी चांगली, सकारात्मक गोष्ट असेल तर तोंड भरून कौतुक करतं शाबासकीची थाप देण्याचं कामं बापू करतं असतात.


मग काय आमंत्रण आलं आणि एक दिवस अगोदरच गावात हजर झालो. तसा जो भेटेल त्याच्या कडून अभिनंदन आणि कौतुक सुरू झालं. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, “याचं साठी केला होता अट्टाहास” हे वचन अनुभवायला मिळणं म्हणजे खरं भाग्य असे मी समजतो. सांगवी भुसार हे गाव आदर्श गांव म्हणून का झालं त्याच मर्म या वैचारिक प्रगल्भ नेतृत्वाच्या विचारातून, आचरणातून आणि स्वभावातून प्रकर्षाने जाणवते.
गांव पातळीवर कामं करणाऱ्या सर्व सामान्य माणसांची आठवण फार कमी लोकांना येते. त्यांत कोरोना सारख्या भयानक संकटात माणसं दुरावत गेली. ती पुन्हा जोडली पाहिजे. नव्हे तर त्यांचा यथोचित सन्मान झाला पाहिजे असं वाटण्यासाठी ह्रदयात प्रेम आणि करूणा असली पाहिजे नाही का!. ती आमच्या गावातील नेत्यांच्या ह्रदयी निरंतर झऱ्या सारखी पाझरते आहे. मग लेखक म्हणून या गोष्टीच कौतुक निश्चितच करावे लागेल. कौतुकास्पद आदर्श उपक्रम ग्रामपंचायत च्या सौजन्याने पार पडला. सर्व समाजातील घटकाला सामावून घेण्याची दृष्टी नेतृत्वाने आजतागायत जपली आहे. याचं उत्तम उदाहरण ठरवा असा हा सोहळा होता.
विशेष म्हणजे या गडबडीत सुध्दा एक ही माणूस सुटता कामा नये यासाठी नानाभाऊंची चाललेली तळमळ पाहून त्यांच्या विषयी असलेला आदर द्विगुणीत झाला. करायचं तर ते चांगलं झालं पाहिजे हा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. अगदी व्यासपीठ कसे असावं, साऊंड व्यवस्था अशी करा अशा सुचना त्यांच्या चालू होत्या. एवढं सगळं करून सुध्दा स्वतः मात्र सामान्य माणसा सारखं इतरां सोबत खाली बसणं. मोठेपणाचा कुठलाही लावलेस नसनारे हे दोघं बंधू म्हणजे संस्कारांचे, आदर्शाचे, नेतृत्वाचे परमोच्च अढळ स्थान ठरावेत. म्हणून तर आदरणीय पंडितराव आण्णांच्या नंतर सुध्दा हे गाव एक ठेवण्याच श्रेय आदरणीय बापूंना आणि नानाभाऊना जातं हे कुणालाही नाकारता येणार नाही.
१५ ऑगस्ट चा दिवस उजाडला आणि लगबग सुरू झाली. नवोदित सरपंच रमेशराव आहेर, उपसरपंच मोहनराव कासार, ग्रामसेवक महेश काळे, कर्मचारी सोमनाथ डफळ आणि इतर कर्मचारी तसेच विलासराव कासार, रोहिदास शिंदे, विजयकुमार जाधव, साहेबराव जाधव आदी मंडळी मोठ्या उत्साहाने तयारीला लागली. शाळेतील मुख्याध्यापक सोनवणे सर आणि त्यांची टिम ध्वजारोहणाच्या तयारीत गुंतली. आमच्या गावात पांच ठिकाणी ध्वजा रोहण केलं जातं. पहिलं सोसायटी, दुसरे जिप शाळा, तिसरे ग्रामपंचायत, चौथे बनकर वस्ती हायस्कूल, पाचवे बनकर वस्ती जिप शाळा. सर्वंच ठिकाणी ग्रामस्थांची उपस्थिती असतेच.
सरकारी आदेशा प्रमाणे कोरोनाचे नियम पाळून मास्क लावून, अंतर राखून विद्यार्थी आणि ग्रामस्थ स्वयं स्फुर्तीने सहभागी झाले. एका शिस्त बध्द शाळेतील विद्यार्थ्यां सारखे सर्वच वागत होते ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली. आपलं हे छोटस खेड गांव किती बदललं याची जाणीव तेंव्हाच झाली. खरं म्हणजे कोरोना महामारीने अनेक चांगले आणि वाईट धडे माणसाला दिले. एक एक करतं सर्व ठिकाणचं ध्वजा रोहण, राष्ट्रगीत, ध्वज गीत पार पडले. सोसायटी समोर चे ध्वजा रोहण श्री भाऊसाहेब शिंदे यांचे हस्ते, जिप शाळेतील श्री राजेंद्र बापू जाधव यांच्या हस्ते, तर ग्रामपंचायत समोरील सरपंच श्री रमेशराव आहेर यांच्या हस्ते पार पडले.


आता मुख्य कार्यक्रम म्हणजे कोरोना योद्धा सन्मान यासाठी व्यासपीठावर अध्यक्ष स्थान अर्थातच आदरणीय बापूंना स्विकारण्याची सुचना मुख्याध्यापक सोनवणे सरांनी मांडली. तिला अनुमोदन कैलास गाडेकर यांनी दिले. विचारांचा आदर्श कृतीतून दिसतो तसा तो दिसला कोरोना आणि इतर कारणाने आपल्यातून निघून गेलेल्या गावातील माणसांसाठी दोन मिनिटे मौन पाळले गेले. माझ्याही नकळत दोन अश्रू डोळ्यात तरळून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव जाधव यांनी अतिशय सुरेख केले. त्यानंतर कैलास गाडेकर यांनी स्वातंत्र्य दिना विषयी माहितीपर भाषण केले. त्यांत रामायण, महाभारत यातील काही समर्पक दाखले दिले. श्री बाळासाहेब कासार यांनी सुध्दा कोरोना आणि स्वातंत्र्य दिन तसेच सन्मान सोहळ्या विषयी उल्लेख करून दिला. भाषण ही सुध्दा एक कला आहे. प्रतेकाला जमेलच असे नाही. यानंतर श्री भीमराज गायकवाड यांनी नेहमीच्या शैलीत अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीचा अभ्यास,आदर त्यांच्या भाषणात झळकत होता.
आज गावात सन्मानाने व्यासपीठावर विराजमान मान्यवर डाॅ. झवर (रवंदे) यांनी सुध्दा सर्व समावेशक मत मांडले. एकूणच कार्यक्रम रंगतदार सुरू होता. या कार्यक्रमात साहित्यिक म्हणून बोलण्याची संधी मला सुध्दा मिळाली. लेखक म्हणून भले मोठे लेख लिहीणारा मी असलो तरी, आपल्या गावातील माणसां समोर उभे राहून काय बोलावे तेच सुचेना. मग सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत. मला आणि इतर साहित्यिक, कोरोना योद्धा यांचा सन्मान हे आदर्श पाऊल उचलले याचा अभिमान वाटतो. अशा संकल्पना राबवणारे आदरणीय राजेंद्र बापू आणि नानाभाऊ हे दोघेही तरूणांना लाजवेल असे कामं करत आहेत. त्यास साथ द्या असे तोडकं मोडकं बोलतं मी थांबलो.
माझे मार्गदर्शक विलास (दादा) बगाटे यांनी अतिशय सुरेख शब्दातून भावना व्यक्त करत विचार मांडले. इतकंच नाही तर आपल्या भाषणातून माझ्या लेख मालिकेचे कौतुक करतं. या लेखांचे संग्रह करून पुस्तक प्रकाशनाचा विषय सोडवला. खरं तर मनाचा मोठेपणा असला की जग जिंकता येत, त्याप्रमाणे विलास दादा ने स्वतःसाठी काहीही न मागता, माझ्या छोट्या प्रयत्नांना शिखरावर पोहचवण्यासाठी बांधलेला शब्द शेतू म्हणजे उदारतेचा, आत्मियतेचा अनमोल ठेवा दिला आहे. माझ्या वाटचालीत त्यांचं बहुमोल योगदान आहे.
त्या नंतर माझे दुसरे मार्गदर्शक नंदकिशोर लांडगे यांनी सुध्दा ओघवत्या शैलीत दर्जेदार विचार मांडले. “आजचा हा सन्मान आमच्या साठी कौतुकाची थाप तर आहेच, त्यासोबत हा आम्हा साहित्यिकांना मिळालेला मोठा पुरस्कार वाटतो,” असे ते म्हणाले. प्रमोद लोहकरे सरांची आठवण करून दिली. नंदकिशोर लांडगे हे साहित्यातले माझे गुरू कारण माझ्यांतला साहित्यिक पाया त्यांनी घडवला.
आमचं तोडकं मोडकं बोलून झाल्यावर आदरणीय बापूंनी आपल्या वक्तृत्वाने वातावरण प्रफुल्लित केले. कोरोना चा भयानक संकट काळात आपल्या तळागाळातील माणसांचं योगदान खूप मोठं आहे . सरकार आपल्या पातळीवर अनेक निर्णय घेऊन काम करतं होतं. पण जिवाची पर्वा न करता घरोघरी जाऊन. प्रत्तेक माणसां पर्यंत पोहचणारे सर्व कर्मचारी यांचा सन्मान आयोजित करून त्यांच्या कामाची दखल घेतली. नव्हे तर त्याचं ॠण व्यक्त करण्याची परंपरा सुरू केली आहे. यांत पोलिस कर्मचारी, पोलिस पाटील, सर्व शिक्षक जिप सांगवी, बनकर वस्ती शाळा, परिसरातील सर्व डाॅक्टर, आरोग्य सेवक, सेविका ,अंगणवाडी सेविका, विज बोर्ड कर्मचारी, तलाठी आप्पा, सज्जा कर्मचारी, सोसायटी कर्मचारी, अन्न धान्य वाटप करणारे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार तसेच गावातील रूग्णांना दवाखान्यात पोचवण्याचं धैर्याच कामं करणारे खाजगी वाहन धारक आणि अनेक अडथळे पार करत किराणा पुरवणारे दुकानदार, विध्दी मार्ग करणारे गुरू यांचा सन्मान आयोजित करणारी बहुतेक पहिलीच संस्था असावी असे मला वाटते. या सर्वांचा उल्लेख करतं शाबासकीची थाप आदरणीय बापूंनी दिली. आणि एक एक करतं सर्वांना श्रीफळ, पुष्प गुच्छ, मानपत्र देऊन गौरव केला. ही यादी खुपच मोठी होती. म्हणून मी प्रतेक नावांचा उल्लेख करू शकत नाही. कोरोना योद्धा म्हणून आपली भुमिका पार पाडत गावातील लोकांचे जिवन वाचविण्याचे कार्य त्या सर्वांनी केले आहे.
कोरोना योद्धा सन्मान सोहळा पार होताच आदरणीय नानाभाऊनीं सुत्रसंचालन हाती घेतले. साहित्यिकांच्या गौरवाचे शब्द आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तसेच साहित्याच्या माध्यमातून सुरू असलेली वाटचाल या सर्व गोष्टींचा उल्लेख करून सन्मानासाठी पाचारण करण्यात येत होतं. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहत होते. गावातील तरूण साहित्यिक आणि उद्योजक म्हणून विलास बगाटे दादा यांना मिळालेला आयकाॅन प्रोफेशनल ऑफ महाराष्ट्र या पुरस्कारा बद्दल तसेच चित्रपट क्षेत्रात नावलौकिक मिळवले. त्यामुळे गावाचे नांव मोठं होतं आहे. या वाटचालीसाठी श्रीफळ, पुष्प गुच्छ, मानपत्र देऊन शुभेच्छा रूपी गौरव करण्यात आला. आदरणीय बाजूंच्या सुचनेनुसार मानपत्राचे वाचन करण्यात आले. आमचे मित्र विलास कासार यांनी सांगितले की गेल्या दोन दिवसांपासून सतत अनेक बदल सुचवत हे मानपत्र आदरणीय बापूंनी लक्ष घालून तयार केले होते. शब्दा शब्दांमधून आत्मियता, प्रेम, अभिमान, गौरव याची प्रभावी मांडणी या मानपत्राद्वारे केली आहे. (सोबत फोटो जोडला आहे)
कवी नंदकिशोर लांडगे (भाऊ) यांच्या कतृत्वाचा उल्लेख करतं. कौटुंबिक आठवण सांगीतली. साहित्यिक घडवण्याच कामं व प्रवासात देत असलेली साथ मोलाची ठरते. गावातील जेष्ठ आदरणीय बाळासाहेब कासार यांनी मागल्या पिढीतील कवी, लावणीकार त्र्यंबक लाड आणि वाण रचनाकार कुशानबा भगत यांची आठवण करून दिली. नंदकिशोर लांडगे यांना श्रीफळ, पुष्प गुच्छ, मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
नानाभाऊंनी माझ्या विषयी बोलताना ग्रामपंचायत मध्ये केलेल्या प्रामाणिक कामाचा आवर्जून उल्लेख केला. त्या भारावलेल्या दिवसात मी त्यांच्या सोबत होतो याचा मला आनंद वाटतो. नानाभाऊ म्हणाले, ” पंडित कामा निमित्त नगरला गेला आणि साहित्यिक झाला. हे कसं घडलं हा प्रश्न मला पडतो. पण त्यांने या क्षेत्रात मिळवलेल यश निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. व्हाटसप वर दर रविवारी लेख मालिकेतून गावातील माणसांची ,जुन्या आठवणी जाग्या करण्याची त्याची पध्दत खूप छान आहे. गावातील प्रतेक जण रविवारच्या लेखाची वाट पाहत असतो. आणि हा लेख वाचला का? अस विचारत असतो. या वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. ” अशा प्रकारे आनंदाने ओला चिंब करणारा प्रसंग अनुभवला तरी आता आपली जबाबदारी वाढली आहे असेच मला वाटते. कारण सर्वांच्या अपेक्षा माझ्या कडून वाढल्या आहेत. असेच चित्र मला दिसलं आहे.
आदरणीय बापूंनी माझा सन्मान होतं असताना आम्ही या लेख मालिकेचे १०० लेख पुर्ण होताच पुस्तकासाठी येणारा सर्व खर्च उचलू असे म्हटले. जमलेल्या सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. त्या प्रसंगाचा आनंद खरंच अवर्णनीय असा आहे. आपण करतं असलेलं छोटस कामं लोकांना आवडते आहे याची ती पोच पावती म्हणावी लागेल. १०० लेख ही माझ्यासाठी ध्येय निश्चिती म्हणावी लागेल. त्या क्षणांचे चित्र आजच डोळ्यासमोर उभे राहते आहे. बघुया कितपत शक्य होईल ते येणारा काळ ठरवेल. असो
माझ्या नंतर गावातील शाहीर राजाभाऊ माळवे यांचा सन्मान होता. काही कारणाने ते उपस्थित राहू शकले नाही. नंतर नवीन लिखाण करणारे कवी दिनेश चव्हाण आणि उमाकांत माळी यांचाही सन्मान करण्यात आला. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती करून देण्यात आली.


आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक श्री विनोदकुमार सोनवणे सर यांनी मानले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर केले. हा कार्यक्रम लाईव्ह युटूब वर दाखवला त्यासाठी संघर्ष न्यूज चे संपादक सोमनाथ डफळ आणि त्यांचे सहकारी दर्शन आहेर यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमानंतर भेटीगाठी चा सोहळा सुरू झाला. आदरणीय बापूं आणि नानाभाऊ यांचा सहवास तसेच अनेक जुन्या, नव्या आठवणींना उजाळा मिळाला. आदरणीय बाळासाहेब कासार यांनी आठवणीने फोन करून अभिनंदन केले आणि काही आठवणी आवर्जून सांगितल्या. माझी लेख मालिका यशस्वी होण्यासाठी गावातील अनेक व्यक्ती सहकार्य करतं आहेत. त्या सर्वांचे ह्रदयातून धन्यवाद मानतो. आणि थांबतो. 🙏🙏

लेखक पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार
ता कोपरगाव जि अहमदनगर
७९७२५२३७१७

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे