समृद्धी महामार्ग व एन.एच. १६० महामार्गामध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पबाधितांच्या अडचणी तातडीने सोडवा – आ. आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी :- जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले असून राज्य शासनाच्या वतीने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्याची प्रशासनाने योग्य अंमलबजावणी करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. व समृद्धी महामार्ग व एन. एच. १६० महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत अशा प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने सोडवा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी प्रशासकीय मुख्य अधिकाऱ्यांना दिल्या.
तहसील कार्यालय कोपरगाव येथे आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच प्रशासकीय मुख्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी गोविंदजी शिंदे, तहसीलदार विजय बोरुडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, वासुदेव देसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिलीप गाडे, दहीफळे, पाटबंधारे विभागाचे गायकवाड, ससाणे, पोळ, भूमी अभिलेखचे अवचरे, गायत्री कन्स्ट्रक्शनचे सुमेध वैद्य उपस्थित होते.
आ.आशुतोष काळे यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना सांगितले की, समृद्धी महामार्ग व सिन्नर-शिर्डी एन.एच. १६० महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्याबाबतीत येत असलेल्या अडचणी दूर करून त्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यासाठी प्रयत्न करा. शासनदरबारी अडचणी येत असतील तर त्वरित मला सांगा. त्याबाबत योग्य मार्ग काढून या अडचणी सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांना ओमायक्रॉनचे नवीन संकट देश व राज्यापुढे उभे आहे. त्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना, नियमावली देण्यात आली आहे तसेच काही निर्बंध देखील घालण्यात आले आहेत. त्या निर्बंधांची कोपरगाव तालुक्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. मात्र अंमलबजावणी करतांना नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, सुधाकर होन, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, सागर लकारे, सर्व ग्रामसेवक आदी उपस्थित होते.