आपला जिल्हामहाराष्ट्र
महाविकास आघाडी सरकारला वीज व शेती सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी भैरवनाथाने सुबुध्दी द्यावी स्नेहलता कोल्हे
महाविकास आघाडी सरकारला वीज व शेती सिंचनाचे प्रश्न सोडविण्यासाठी भैरवनाथाने सुबुध्दी द्यावी स्नेहलता कोल्हे.
कोपरगांव प्रतिनिधी :- सोमनाथ डफाळ
वीजेचे भारनियमन मोठया प्रमाणांत करण्यात आल्याने सर्वसामान्य ग्राहकाबरोबरच शेतकरी राजाची शेती बेभरवशाची झाली आहे, वीज आणि शेती सिंचनाचे प्रश्न मोठया प्रमाणांत निर्माण झाल्याने भैरवनाथांनी या सरकारला हे निकडीचे प्रश्न सोडविण्याची सुबूध्दी द्यावी अशी प्रार्थना भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केली.

तालुक्यातील चांदेकसारे येथील जाज्वल्य ग्रामदैवत देवस्थान असलेल्या भैरवनाथांची यात्रा दोन वर्षांनंतर प्रथमच सार्वजनिकरित्या भरली त्याप्रसंगी सौ. स्नेहलता कोल्हे यांनी विधीवत भैरवनाथाची पुजा केली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. देवस्थान पंच कमिटीचे वतीने यावेळी स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक संजय होन प्रास्तविक करतांना म्हणाले की, ग्रामदैवत भैरवनाथ चांदेकसारेवासियांची नेहमीच सुरक्षा करत आलेले आहे, कोरोनाची महामारी मोठी होती त्यामुळे भैरवनाथ यात्रा उत्सव दोन वर्षापासुन बंद होता, त्यावर अवलंबुन असलेल्या असंख्य छोटया मोठया व्यावसायिकांचे हाल झाले. चालु वर्षी प्रथमच यात्रेचे आयोजन करण्यांत आले. गांवक-यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिला आहे.
याप्रसंगी सर्वश्री केशव होन, विजय होन, ज्ञानेश्वर होन, अशोक होन, विलास होन, गणेश होन, आण्णासाहेब होन यांच्यासह चांदेकसारे पंचकोशीतील भाविक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, व्यावसायिक मोठया संख्येने उपस्थित होते.

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोपरगांव तालुक्यात यंदा उष्णतेचा कहर झाला आहे. शेतक-यांकडील पशुधन जगविण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागत आहे, त्यातच वीज वितरण कंपनीच्या लहरी कारभाराचा फटका शेतक-यांना बसला. विहीरींना पाणी असुनही ते पिकांना देता आले नाही त्यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नाशिक येथील मुख्य अभियंता व कार्यकारी अभियंता संगमनेर यांच्यास्तरावर तसेच उर्जाराज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना येथील शेतक-यांचे वीज ग्राहकांचे गांभीर्य लक्षात आणून देवुन त्याच्या व सोडवणुकीसाठी प्राधान्याने संबंधीत अधिका-यांना सुचना व्हाव्यात म्हणून मागणी केली आहे, आता भैरवनाथांना देखील या प्रश्नाचे साकडे टाकले आहे. जनता जनार्दनानी उत्सव सार्वजनिक झाले म्हणून घाई न करता स्वतःच्या आरोग्याबरोबरच दुस-यांच्याही आरोग्याची काळजी घेत उत्सव साजरे करावे, उन्हाची काहीली प्रचंड आहे त्यात अबाल वृध्दाबरोबरच पशूधनाची जपवणूक करावी. वीज शेती सिंचनाबरोबरच तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, घोषणेपेक्षा त्या कृतीतुन सोडविल्या गेल्या पाहिजे तेंव्हाच खरा विकास होतो असेही त्या शेवटी म्हणाल्या.
