*’सातबारा’ मोबाईलशी लिंक होणार*
*खातेदारांनी तलाठ्याकडे माहिती सादर करावी*
*शिर्डी प्रतिनिधी –* महसूल विभागाच्या ‘ई-फेरफार’ प्रकल्पात आता खातेधारकांच्या ‘सातबारा’ उताऱ्यावर मोबाईल क्रमाकांसह ई-मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी माहिती संकलित करायचे काम सुरू असून खातेधारकांनी वैयक्तिक संपर्काची माहिती तलाठी कार्यालयात सादर करावी. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
शासनाने ‘ई-फेरफार’ प्रकल्पात जमीनमालकांची वैयक्तिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. सातबारा उताऱ्यावरील खातेदारांना त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी ‘भूमी अभिलेख’ विभागाकडून संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. ‘भूमी अभिलेख’ विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. खातेदारांची प्राप्त झालेली माहिती तपासून झाल्यानंतर तलाठी डेटाबेसमध्ये साठविणार आहेत. यामुळे जमीन व्यवहाराच्या माहितीमध्ये बदल करून परस्पर व्यवहार करणे, बोगस कागदपत्रे सादर करून सातबारा उताऱ्यावर नावे दाखल करणे, बोजा चढविणे, वारस नोंद घालणे आदी जमीन व्यवहाराची माहिती खातेदाराच्या ‘सातबारा’ लिंक असलेल्या संपर्क क्रमांकावर मिळेल. यातून फसवणूकीला आळा बसणार आहे. याचबरोबर बँक खाते माहितीच्या आधारे शेतपीकांची नुकसान भरपाई थेट बॅक खात्यावर तात्काळ देण्यास सुलभता देण्यात येणार आहे.
जमीनमालक/खातेधारकांनी गावाचे नाव, खातेदाराचे नाव, गट नंबर, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी (ऐच्छीक), आधारक्रमांक, बॅकेंचे नाव, बॅक खाते क्रमांक, आयएफएससी कोड आदी माहिती आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे जमा करावी. असे आवाहन श्री.कुंदन हिरे यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.