एक रुपयात विमा पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी सव्वा कोटी शेतकऱ्यांचे अर्ज दाखल
एक रुपयात विमा पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी सव्वा कोटी शेतकऱ्यांचे अर्ज दाखल
मुंबई प्रतिनिधी :- पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी ऑनलाइन प्रणालीतून सव्वा कोटी अर्ज दाखल झाले आहेत. यंदा पीकविम्यासाठी अर्जांची संख्या दीड कोटीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी सांगितले की, पीकविमा योजनेला यंदा मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. बुधवारी (ता. २७) रात्री शेतकऱ्यांनी केवळ तीन तासांत साडेतीन लाख अर्ज दाखल झाले. गुरुवारी (ता. २७) सकाळपर्यंत एकूण अर्जांची संख्या एक कोटी २८ लाखांच्या पुढे गेली.रोज पाच ते सात लाख अर्ज येत आहे. शेतकऱ्यांना विमा अर्ज भरण्याची सुविधा सुट्टीच्या दिवशीदेखील उपलब्ध करून देण्याच्या सूचना बॅंका तसेच सार्वजनिक सुविधा केंद्रांना देण्यात आल्या आहेत.गेल्या खरिपात ९६.६२ लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. यंदा एक रुपयात विमा उपलब्ध असल्यामुळे नोंदणी जास्त होण्याची शक्यता आहे.तसेच, राज्याच्या काही भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. तर, काही भागांमध्ये पिकांचे झालेले नुकसान दहा लाख हेक्टरपर्यंत झालेले आहे. त्यामुळे यंदा पिकांचा विमा उतरविण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.पीकविम्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत असली तरी तशा कोणत्याही हालचाली शासनाच्या पातळीवर झालेल्या नाहीत.
‘‘मुळात ३१ जुलैनंतर कोणत्याही पिकाची पेरणी करणे चांगल्या उत्पादनासाठी हिताचे नाही. मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य शासनाने विधिमंडळात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या दोन दिवसांत मुदतीत विमा योजनेत सहभागी होणे योग्य ठरेल,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.