शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे – ना.आशुतोष काळे
शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे – ना.आशुतोष काळे
कोपरगाव प्रतिनिधी –गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२२-२३ साठी चालू खरीप हंगामातील उभी पिके तसेच पेरणी झालेली पिके, चारा पिके, अन्न धान्य, कडधान्य व तेल बियांचे पिकांना गोदावरी कालव्यातून पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी ७ नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी तातडीने जास्तीत जास्त ७ नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे खात्याच्या संबंधित शाखा कार्यालयाकडे जमा करावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केले आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ना.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, गोदावरी कालव्यातून खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे. वेळेत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना या आवर्तनाचा फायदा होणार आहे. भविष्यात यदाकदाचित पावसाने उघडीप दिल्यास उभ्या पिकांना पाण्याची गरज भासू शकते त्यावेळी या आवर्तनाचा लाभ शेतकऱ्यांना होईल. त्यासाठी १९ ऑगस्ट पर्यंत सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करणे गरजेचे आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाला पाणी वाटपाचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ७ नंबर पाणी मागणी अर्ज मुदतीच्या आत दाखल करावे असे आवाहन ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.