नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबाराच्या माध्यमातून पुन:श्च हरिओम
नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबाराच्या माध्यमातून पुन:श्च हरिओम
या जनता दरबारातील प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नये, अधिकाऱ्यांना दिली तंबी
कोपरगाव प्रतिनिधी – नागरिकांचे सर्व शासकीय कार्यालयातील प्रश्न व अडी अडचणी तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी मतदार संघातील नागरिकांना जनता दरबाराचे खुले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जेणेकरून त्यांच्या हक्काच्या सेवकाला त्यांचे प्रश्न प्रत्यक्षपणे सांगण्याची संधी मिळावी व सबंधित अधिकाऱ्याकडून हे प्रश्न तातडीने सुटावे हा त्यामागचा उद्देश आहे. या जनता दरबारात नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरुपात सबंधित विभागाकडे दिल्या आहेत. पुढील जनता दरबारात यापैकी किती नागरिकांचे प्रश्न व अडचणी सुटल्या याचा खुलासा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे व त्याचा जाब त्या अधिकाऱ्याला पुढील जनता दरबारातच द्यावा लागणार आहे. त्यामुळे या जनता दरबारातील प्रश्न पुढच्या जनता दरबारात येता कामा नये अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे घेतलेल्या जनता दरबारात विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील असंख्य नागरिकांचे विविध शासकीय कार्यालयात अनेक प्रश्न रेंगाळत पडलेले होते. नागरिक चकरा घालून थकले होते मात्र प्रश्न काही सुटत नव्हते. नागरिक व अधिकारी एकाच व्यासपिठावर येवून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील नागरिकांना आपल्या अडचणी व प्रश्न मांडण्यासाठी जनता दरबार सुरु केले. पहिल्याच जनता दरबारात नागरिकांच्या असंख्य अडचणींचा अक्षरशः पाऊस पडला होता मात्र सबंधित अधिकाऱ्यांना ना. आशुतोष काळे यांनी जागेवरच कानपिचक्या दिल्यामुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली. त्यामुळे दर दोन ते तीन महिन्यांनी जनता दरबार घेण्याचे ना. आशुतोष काळे यांनी ठरविले होते त्याप्रमाणे जनता दरबार सुरु होते परंतु दोन वर्षापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीमुळे कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी निर्बंध घालण्यात आल्यामुळे जनता दरबार बंद होते. तरीदेखील प्रत्यक्ष भेटीतून ना. आशुतोष काळेंचे नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरूच होते. या समस्या सोडविण्याला गती देण्यासाठी ना. आशुतोष काळे यांनी पुन्हा एकदा जनता दरबाराच्या माध्यमातून पुन:श्च हरिओम केला आहे. यावेळी नागरिकांच्या अडचणी लेखी स्वरूपात घेवून सबंधित अधिकाऱ्यांना त्याबाबत तातडीने निर्णय घेवून कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या नागरिकांच्या अडचणी व प्रश्न जास्तीत जास्त स्वरूपात कसे मार्गी लागतील यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत महसूल विभाग, नगरपालिका, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमी अभिलेख, पाटबंधारे विभाग, कृषी विभाग, ग्रामीण रुग्णालय, रेल्वे विभाग, सहाय्यक निबंधक विभाग, दुय्यम निबंधक विभाग, वन विभाग, कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, सामाजिक वनीकरण, वखार महामंडळ आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत जनता दरबार घेतला. या जनता दरबार प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता प्रशांत वाकचौरे, डावा कालवा उपअभियंता थोरात, उजवा कालवा उपअभियंता महेश गायकवाड, प्र.तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, कोपरगाव नगरपरिषदेचे ज्ञानेश्वर चाकणे, महावितरण अभियंता भूषण आचार्य, सहा. अभियंता अतुल खंदारे, यज्ञेश शेलार, डी.डी.पाटील, सहा.पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक यशवंत ठोंबरे, चारी ड्रेनेज उपअभियंता शिंदे, वनविभाग श्रीम.प्रतिभा पाटील, सामाजिक वनीकरण उपअभियंता श्रीम.पूजा रक्ताटे, मेडिकल ऑफिसर डॉ.कृष्णा फुलसौंदर, आदी खात्याचे अधिकारी, सभापती सौ.पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवक अध्यक्ष नवाज कुरेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, मंदार पहाडे, हाजीमेहमूद सय्यद, जिल्हापरिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके, फकीर कुरेशी, आकाश डागा, राजेंद्रे जोशी,चंद्रशेखर म्हस्के, प्रदीप कुऱ्हाडे, समाजसेवक संजय काळे, राजेंद्र खिलारी, सागर लकारे. किरण बागुल,नंदकिशोर औताडे,नारायण लांडगे, इम्रीयाज अत्तार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.