कोपरगाव शहरातील कर्मवीर नगरमध्ये पावसाचे पाणी शिरले घरांत!
कोपरगाव शहरातील कर्मवीर नगरमध्ये पावसाचे पाणी शिरले घरांत!
पालिकेला राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष कपिलेंसह थोरातांचा उपोषणाचा इशारा
कोपरगाव प्रतिनिधी- सोमनाथ डफाळ
पालिकेच्या उदासीन कारभाराचा आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे पालिकेला लाखो रुपयांचा कर भरणाऱ्या शहरवासियांच्या नशिबी हालअपेष्टा सोसण्याची वेळ येत आहे. शहरातील कर्मवीर नगर व दुल्हनबाई वस्ती येथे सोमवारी (ता.4) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले. पावसाचे पाणी थेट घरांत शिरल्याने बाया-बापड्यांना लहानग्यांना घेऊन रात्र जागून काढावी लागली. यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप कपिले, शहर उपाध्यक्ष भावेश थोरात यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
सोमवारी सायंकाळनंतर आकाशात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर काही वेळातच धो धो पाऊस कोसळण्यास सुरूवात झाली. बराच वेळ पाऊस झाल्याने कोपरगाव शहरातील सर्वच भागांत पाणीच पाणी झाले. मात्र, कर्मवीर नगर आणि दुल्हनबाई वस्ती येथे पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. साधारण कमरेएवढे पाणी घरात शिरल्याने बाया-बापड्यांना लहानग्यांना घेऊन रात्र जागून काढावी लागली. यामुळे कायमच पालिकेच्या उदासीन कारभाराचा फटका बसलेल्या शहरवासियांत संतापाची लाट उसळली आहे. लोकप्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असल्याने आता नागरिकांच्यावतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप कपिले, शहर उपाध्यक्ष भावेश थोरात यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. यापूर्वी देखील दूषित पाणी पुरवठा आणि गटारीची समस्याबाबत पालिकेला निवेदने दिलेली आहे. त्याची दखल घेतली नसल्याने नागरिकांवर पालिकेला लाखो रुपयांचा कर भरुनही ही दुर्दैवी वेळ आली आहे.